अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेखसह एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एक मोठा घातपात घडवून आणण्याचे या दहशतवाद्यांचे नियोजन असल्याची माहिती प्राथमिक चौकशीअंती उघड झाली आहे. या दहशतवाद्यांना विस्फोटकांचा वापर करून पुन्हा एकदा मुंबईवरील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच स्फोट घडवून आणायचे होते. मात्र, हल्ल्याचा कट शिजत असतानाच सर्व संशयितांना अटक झाल्यामुळे मोठा घातपात टळला आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अटकेतील दहशतवाद्यांची चौकशी करत आहे.
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर (वय 47), उस्मान (वय 22), मूलचंद (वय 47), झिशान कामर (वय 28), मोहम्मद अबू बकर (वय 23) आणि मोहम्मद आमिर जावेद (वय 31) अशा सहा जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये छापे टाकून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईच्या धारावीमध्ये वास्तव्यास होता. तो मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी टेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली होती.
अन्य संशयितांवरही तपास यंत्रणांची नजर
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी काही लोकांची नावे घेतलेली आहेत. देशात दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर सेल म्हणून ही माणसे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसात या लोकांचीही धरपकड केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी अन्य संशयितांच्या अटकेसाठी आणखी काही पथके नियुक्त केली असून त्यांना ठिकठिकाणी रवाना करण्यात आले आहे. देशात पुन्हा एकदा 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसारखा हल्ला घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी जमा केलेले दीड किलो आरडीएक्स देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. या स्फोटकांची तपासणीही विशेष पथकाकडून केली जात आहे.