सातारा/ प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यजन बेकार झाला आहे.रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाला असे सर्वच आपल्या कमाईपासून वंचित आहेत.त्यांना आपत्कालीन भत्ता म्हणून 5 हजार रुपये शासनाने द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, त्यांनी जिल्हाधिकारी यांना जीवनावश्यक वस्तूंचा सुलभतेने पुरवठा करण्याची विनंती केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष पप्पू लेवे, सागर पावशे उपस्थित होते.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेरोजगाराना आपत्तीकालीन भत्ता मिळावा आज राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरी वाले, गंवडी, फळविक्रेते, मजूर, शेत मजूर, नाभिक असे समाजातील अनेक घटक गेले 45 दिवस आपल्या कमाईपासून वंचित आहेत.अशा सर्व घटकास आपत्तकालीन भत्ता 5 हजार रुपये शासनाच्या वतीने देण्यात यावा, तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन सर्व व्यवसाय सुरू करण्याच्या उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे तसेच दुसऱ्या दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला सुलभतेने पुरवठा करण्याबाबत कालच आपण म्हटल्या प्रमाणे ठराविक दुकानदार घरपोहच सेवा देणार, यामध्ये मी आपणास विनंती करू इच्छित आहे की संपूर्ण बाधित अथवा बिगर बाधित परिसरात आपण ठराविक वेळ देऊन सरसकट भाजीपाला दूध विक्रेता, किराणा विक्रेता, औषध विक्री झाली तर जनतेला ते बरे पडेल, तसेच बाधित परिसरात सकाळी व बिगर बाधित परिसरात संध्याकाळी अशी वेळ दिली गेली तर गोंधळ होणार नाही. सर्वांना शांतपणे आपापल्या दुकानदाराकडून माल रोख अथवा उधार घेता येऊ शकेल, जिल्ह्यात दारू विक्रीला नकार दिल्याबद्दल आपले अभिनंदन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा ही झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले.