प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्याला महापूर तसा नवीन नाही. पण 2019 सालच्या प्रलयंकारी महापुराने पूरग्रस्त नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. नरसिंहवाडी ता. शिरोळ येथील प्रबुद्धनगर मध्ये पुराचे पाणी शिरले असून येथील दहाहून अधिक कुटुंबे समाज मंदिरात स्थलांतरित झाली आहेत. तर यातील एका कुटुंबाने औरवाड फाटा येथे रस्त्याच्या कडेला चक्क एका ट्रकमध्येच आपला संसार थाटला आहे.
तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे येथे दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत तीन फुटाने वाढ झाली आहे. यामुळे पुराचे पाणी नृसिंहवाडीतील नागरी वस्तीमध्ये शिरले आहे. बाबर प्लॉट, रामनगर, सुमित्रा मंगल कार्यालय परिसर, प्रबुद्ध नगर येथील 20 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.
प्रबुद्धनगर येथील रामचंद्र कांबळे व मंगला कांबळे यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांनी आपला संसार औरवाड फाटा येथे रस्त्याच्या कडेला एका ट्रकमध्ये थाटला असून यामध्येच तडपत्री छत केले आहे.
याबाबत बोलताना रामचंद्र कांबळे म्हणाले, सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने आम्हाला बाहेर कोणी ठेवून घेणार नाही. घरात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे आम्हाला हा पर्याय निवडावा लागला. घरातील पुराचे पाणी ओसरेपर्यंत येथेच आम्ही आमच्या कुटुंबासमवेत मुक्काम करणार आहोत.