लॉकडाऊनमुळे गोंदीया एक्सप्रेसने आलेले चौघे रेल्वे कर्मचारी महिनाभर कोल्हापुरात
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात 22 मार्चला दुपारी एक वाजता गोंदिया एक्सप्रेस आली. अन् देशभर लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून रेल्वे वाहतूक ठप्प आहे. एकही रेल्वे रुळावरुन धावलेली नाही. त्या दिवशी गोंदीया एक्सप्रेसमधून आलेले चौघे एसी अटेंडन्ट परत घरी गेलेच नाहीत. त्यांचा मुक्काम येथील रेल्वे स्टेशनवर आहे. त्यांना मध्य रेल्वे कोल्हापूर स्टेशनचे मुख्य पार्सल पर्यवेक्षक अशोक जाधव व त्यांचे सहकारी जेवणासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. या मदतीतून त्यांनी कोल्हापूरच्या मायेचा अन् माणुसकीचा अनुभव घेतला आहे.
महिनाभरापासून कोरोना प्रतिबंधासाठी देश लॉकडाऊन आहे. दळणवळण थांबले आहे. 22 मार्चला येथे आलेली गोंदीया एक्स्प्रेस जाग्यावर आहे. या रेल्वेतून आलेले गोंदियाचे दोन आणि बिहारचे दोन असे चौघे एसी अटेंडन्ट (स्पेशल क्लासमधील मदतनीस) कोल्हापुरात अडकले आहेत. खासगी कंपनीमार्फत ते ठेकेदारीवर कार्यरत आहेत. चौघांनी फेब्रुवारीचा पगार घरी पाठवला आहे. परत जाण्याच्या आशेने ते आले, त्यामुळे थोडीफार रक्कम होती, तीही संपून गेली. अन् घरापासून कोसो दूर जगायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
रेल्वे स्टेशन परिसरातील संकटविमोचन हनुमान मंदिर आणि रेल्वे स्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षक अशोक जाधव यांनी त्यांना धीर दिला. तसेच या चौघांनाही आजपर्यत दोन वेळचे जेवण दिले जात आहे. गोंदियाचे शशिकांत चौरासिया, कैलास राऊत आणि बिहारचे अनिल आणि भागीरथी हे चौघेही कोल्हापुरातील माणुसकीच्या दर्शनाने भारावले आहेत. येथील माणुसकीची ऊब ते अनुभवत असले तरी घराची ओढ लागली आहे, जाण्याचे कोणतेही साधन नसल्याने घरी जाणे मुश्किल आहे, अशी खंत व्यक्त करतानाच त्यांनी कोल्हापुरी पाहुणचाराला मात्र सलामच केला आहे.