सांबरा : सांबरा येथे रविवारी तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या बहिणींवर रविवारी रात्री उशिरा यद्दलगुड (ता. गोकाक) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सांबरा येथील बसवण्णा तलावात लक्ष्मीपूजेचे निर्माल्य सोडायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता. नेत्रा ईराण्णा कोळवी (वय 8) व प्रिया ईराण्णा कोळवी (वय 6) या दोघींचा बुडून मृत्यू झाला तर संध्या ईरान्ना कोळवी (वय10) हिला वाचविण्यात यश आले होते. रविवारी रात्री शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
येथील बसवण्णा तलावाची दोन वर्षांपूर्वी उद्योग खात्री योजनेतून खोली वाढविण्यात आली आहे. अद्याप तलाव भरलेला असून तलावातील खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत तेथे सूचनाफलक बसवून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.या घटनेमुळे धोकादायक तलाव व धोकादायक खड्डय़ांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तालुक्मयात अनेक गावातील तलावांची उद्योग खात्री योजनेअंतर्गत खोदाई करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी क्वारीसाठी खोदलेले धोकादायक खड्डेही आहेत. वास्तविक पाहता या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना राबविणे गरजेचे आहे.
यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी आपापल्या परिसरातील अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी सूचना फलक लावले पाहिजेत. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना पाठविताना थोडा विचार करणे गरजेचे आहे, तरच अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत.