मुंबई/प्रतिनिधी
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली आहे. प्रताप सरनाईकांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी काळात काँग्रेस नसेल तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित येऊन निवडणूक लढवू शकतात असे म्हंटले होते. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता तर शिवसेना आमदाराने भाजपासोबत पुन्हा युती करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भातलं एक पत्रच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
दरम्यान काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आधीच महाविकासआघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केलं जात असताना प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मुळे ते प्रश्नचिन्ह अधितच मोठं झाल्याचं दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून या पत्रावर काय खुलासा येतो, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलं आहे.
प्रताप सरनाईकांनी मित्रपक्षांविषयी केली तक्रार
तसेच या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. “सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सरनाईकांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”, असे पत्रात म्हंटले आहे.