वाळपईतून नवोदयच्या विद्यार्थ्यांना पोचविले दिल्लीत, तरुण भारतशी साधला संवाद
वार्ताहर / मांद्रे
कोरोनाबाधित क्षेत्रातून प्रवास करून नवोदयच्या गोवास्थित दिल्लीतील विद्यार्थ्यांना तसेच दिल्लीस्थित गोव्यातील विद्यार्थ्यांना कदंब राज्य परिवहन महामंडळाने घरी पोचविले. या बस वरील चालक पेडणेतील सावंतवाडा मांद्रे व दाडाचीवाडी धारगळ येथील अनुक्रमे सावळो परब, महेश भगवान कानोळकर यांचा या कार्यात मोलाचा वाटा आहे. या दोन चालकांनी कौतुकास्पद कामगिरी करून कदंब महामंडळाबरोबरच मांद्रे व धारगळ या गावाला लौकिक प्राप्त करून दिला.
दि. 5 मे रोजी वॉल्वो बस रात्री 10.30 वा. वाळपई येथून निघाली व 7 रोजी सकाळी 9.30 वा. ते 10 दरम्यान दिल्लीला पोहचली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 4.30 वा. परतीचा प्रवास सुरू केला. नियोजितस्थळी जाण्यास रस्ता व्यवस्थित नसल्याने थोडी नाराजी झाली. दुसरा मार्गावरून बस नियोजित स्थळी पोचली. ही बस दोन्ही चालकांनी अविरहित चालविली. कुठेही विश्रांतीसाठी बस थांबविली नाही, असे या दोन्ही चालकांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
या विद्यार्थ्यांबरोबर एक शिक्षिका, शिक्षक, महिला पोलीस व पुरुष पोलीस सहकार्यास होता. या सर्वानी प्रवासात खूप मदत केली. तसेच आमचा प्रवास कुठल्याही अडचणीशिवाय व्हाया यासाठी डेपो व्यवस्थापक पेडणेकर, डिटीओ प्रसाद सुभेदार, जनरल मॅनेजर जी. एम. घाटे, मॅनेजिंग डायरेक्टर फुर्तादो, एटीस गावस, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजन गावस, वाळपई पोलीस निरीक्षक यांचेही परिश्रम आहेत. दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून सुखरुपपणे दिल्लीतून गोव्यात आणलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. सध्या आम्ही 23 मे पर्यंत होम क्वारंटाईन असल्याचे चालक महेश कानोळकर व सावळो परब यांनी सांगितले.