आमदार दीपक केसरकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून हटविण्याच्या कारवाईला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ही कृती म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही केसरकर यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य बंडखोर आमदारांसह गोव्यात तळ ठोकून असलेले केसरकर शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे. त्यामुळे पक्ष संघटनेच्या नेतेपदावरून तुम्हाला हटविण्यात येत आहे’, अशा आशयाचे पत्र उद्धव ठाकरे यांनी श्री. शिंदे यांना पाठविले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
शिंदे हे आजही आमचे नेते आहेत. शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेल्या सर्वांनी त्यांना संघटनेचे नेते म्हणून निवडले होते. ते नेतेपद कुणीच त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही, असे केसरकर म्हणाले.
सभागृह नेतेपदी निवडून येऊन मुख्यमंत्री बनतो तो एका पक्षापुरता मर्यादित राहत नाही. तो सभागृहातील सर्व पक्षांचा नेता बनतो, अशी परंपरा आहे. म्हणूनच त्यांना घरचा नेता म्हटले जाते. अशावेळी श्री. ठाकरे जेव्हा घरच्या नेत्याला पक्षातून काढून टाकल्याचे सांगतात, तेव्हा त्यांनी आपण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करत आहे की नाही, याचा विचार करायला हवा, असे केसरकर यांनी सांगितले.
आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही. मात्र त्यांनी पाठवलेल्या कायदेशीर पत्राला जरूर उत्तर देणार असून त्यासंदर्भात कायदेशीर सल्लाही घेणार आहोत, असे केसरकर म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गोव्यात वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांनी मोठा जल्लोष केला होता. त्यावेळी त्यांनी हॉटेलात जो डान्स केला तो सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यासंबंधी विचारले असता केसरकर यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला. मात्र त्यासंबंधी खुलासा करताना त्यांनी त्या व्हीडिओत डान्स करताना दिसणारे सर्वजण आमदार नव्हते असे ते म्हणाले. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
सर्व बंडखोर मुंबईकडे रवाना
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून दोनापावल येथील एका पंचतारांकीत हॉटेलात तळ ठोकलेले सर्व बंडखोर आमदार शनिवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले. गोव्यातील या वास्तव्यादरम्यानच या आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. त्या नंतर लगेचच ते शपथविधीसाठी मुंबईकडे रवाना झाले होते व तेथून गुरुवारी रात्री ते पुन्हा आपल्या सहकाऱयांकडे आले होते. या दरम्यान मुंबईत दमदार पाऊस कोसळल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यासंबंधी आयोजित आपत्कालीन बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी पुन्हा दुसऱयांदा मुंबईत जाऊन परत आले. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदार पोलीस संरक्षणात रस्तामार्गे दाबोळी विमानतळावर दाखल होऊन हवाईमार्गे मुंबईकडे रवाना झाले.