प्रतिनिधी / सातारा :
शहरात गुरुवार बागेसमोर रस्त्यावर पडलेल्या खड्डयाने युवकाचा बळी घेतला गेला आहे. त्यामुळे संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांवर व पालिकेच्या ठेवदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर हुतात्मा स्मारक येथे हुतात्मांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील गैरप्रकाराचीही चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात रिपाइंचे सोमनाथ धोत्रे, मदन खंकाळ, किरण ओव्हाळ, दीपक गाडे, जयवंत कांबळे, किरण ओव्हाळ आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गुरुवार बागेसमोर असणाऱ्या शुभम गॅरेजच्या शेजारी पालिकेने पाईप लाईन खोदण्यासाठी बॅरिकेट टाकल्यामुळे वाहनांची गर्दी झालेली आहे. संबंधित ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते बॅरिकेट दोन महिन्यापासून तेथेच आहे. त्यामुळे विनायक साळुंखे या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. एकदंरच टेम्पो व दुचाकीची धडक नसून, त्या खडय़ामुळे मृत्यू झालेला आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियास मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा रुग्णालयात गैरकारभार सुरु आहे. त्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.