ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी ठरल्याप्रमाणे होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सुरक्षितता म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या पाच खेळाडूंसह भारतीय संघ सोमवारी चार्टर्ड विमानाने तिसऱया कसोटीसाठी सिडनीकडे प्रयाण करणार आहे. त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियन संघही असणार आहे, असे सांगण्यात आले.
उपकर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी व फलंदाज पृथ्वी शॉ यांना शनिवारच्या प्रकारानंतर आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांनी जैवसुरक्षित कवचाचे उल्लंघन केले आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला होता. पण सिडनीकडे ते संघासोबतच जाणार आहेत. त्यांना कोणतीही मनाई करण्यात आलेली नाही. एका चाहत्याने वरील पाचही खेळाडू एका इनडोअर हॉटेलमध्ये असतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर खळबळ माजली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व बीसीसीआय यांनी संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवेदन लक्षपूर्वक वाचल्यास, त्यात भारतीय खेळाडूंनी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा अजिबात उल्लेख नसल्याचे दिसेल. त्यांच्याकडून उल्लंघन झाले आहे का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सीएने त्यात म्हटले आहे. त्यामुळे या पाच खेळाडूंवर संघासोबत प्रवास करण्याबाबत कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. या पाच खेळाडूंसह संपूर्ण संघ सोमवारी दुपारी सिडनीकडे प्रयाण करणार आहे,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनीयतेच्या अटीवर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
या प्रकरणी जो वाद निर्माण झालाय, त्यावर भारतीय संघ नाराज असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे त्याची हाताळणी केलीय, त्याचेही त्यांना आश्चर्य वाटलेले नाही. ‘त्या चाहत्याने (नवलदीप सिंग) पंतला आलिंगन दिल्याचे सोशल मीडियावर खोटे सांगितले नसते तर हा वाद निर्माणच झाला नसता. पाऊस सुरू झाल्यामुळे हे पाच खेळाडू हॉटेलच्या आत गेले होते. नवलदीप सिंगने परवानगी न घेताच त्यांचे व्हिडिओ चित्रण केले आणि त्याने त्यांचे बिलही अदा केले. याची खेळाडूंना मात्र अजिबात कल्पना नव्हती. प्रसिद्धीसाठी त्याने त्या बिलाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकून सगळा गोंधळ निर्माण केला. एखाद्या व्यक्तीने हेतुपूर्वक व्हिडिओ टाकल्याच्या व नंतर घुमजाव केल्याच्या आधारावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया निर्णय घेईल, असे कोणीही समजू नये,’ असेही हा पदाधिकारी म्हणाला.
प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरेंवर ठपका
या प्रकरणी बीसीसीआयने पूर्ण ठपका ठेवला आहे तो प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांच्यावर. ते बीसीसीआयने नियुक्त केलेले कर्मचारी असून कोव्हिड 19 साठी घालून दिलेल्या शिष्टाचाराचे पालन होत आहे का, हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. नियमावलीची यादी घेऊन फिरणे हे खेळाडूंचे काम नाही. यासाठी पूर्णतः व्यावसायिक पथक नियुक्त केलेले आहे आणि प्रत्येक नियमाचे पालन होत असल्याचे ते पाहत आहेत. इनडोअर क्षेत्रात जाऊ न देण्याची सूचना डोंगरे यांनी खेळाडूंना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.
सिडनीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या प्रांतांनी सरहद्दबंदी केली आहे. तिसरी कसोटी सिडनीतच होत असल्याने त्यामुळे ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रिस्बेनमध्ये गेल्यास खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सक्तीला सामोरे जावे लागणार आहे आणि यासाठी भारतीय खेळाडू अजिबात तयार नाहीत. त्यामुळे चौथी कसोटी धोक्यात आली असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने रविवारी वृत्त दिले होते. चौथी कसोटीही सिडनीतच खेळविली जावी, असा एक पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा त्याला विरोध असल्याचे समजते. पण 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमधील गब्बा मैदानावर होणारी कसोटी ठरल्याप्रमाणे घेतली जाईल, असे संकेत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू अगदी काटेकोरपणे जैवसुरक्षित कवचात राहिले असल्याने या कसोटीसाठी खेळाडूंना ब्रिस्बेनमध्ये येण्याची मुभा देण्यात आली आहे. कडक सुरक्षा कवच त्या ठिकाणीही असणार आहे. सध्या तरी बीसीसीआयने कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनीला घेण्याबाबत कोणतीही सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केलेली नाही. पण परिस्थिती नाजूक असून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असेही हा पदाधिकारी म्हणाला.
भारताच्या सराव सत्रावर पावसाचे पाणी
मेलबर्नवरील एमसीजीवर भारतीय संघ रविवारी सराव करणार होता. पण पावसाच्या आगमनामुळे हे सराव सत्र रद्द करण्यात आले आणि खेळाडूंना इनडोअर सराव करणे भाग पडले. 7 जानेवारीपासून सुरू होणाऱया कसोटीच्या तयारीसाठी खेळाडूंनी जिममध्ये व्यायाम करण्यावर भर दिला होता, असे बीसीसीआयने सांगितले.