मालवण /प्रतिनिधी-
तारकर्ली येथील ज्येष्ठ गणेश मूर्तिकार आप्पाजी श्रीधर तारी यांच्या गणेश मूर्ती शाळेची अतिवृष्टीत पडझड झाल्याने येथील गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी तात्पुरती जागा मिळण्याची मागणी श्री. तारी यांनी प्रशासनाकडे केली होती. या समस्येकडे भाजप नेते दत्ता सामंत यांनी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे लक्ष वेधल्यानंतर या गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जि. प. अध्यक्षांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे येथील गणपती बाप्पाना आसरा मिळाला आहे.
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे आप्पाजी श्रीधर तारी हे ज्येष्ठ गणेशमूर्तिकार आहेत. त्यांची तारकर्ली मध्ये “भवानी कला केंद्र” या नावाने गणेशमुर्ती शाळा आहे. परंतू यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गणेश मुर्ती शाळेची एक भिंत पडून गेलेली आहे. तसेच सदर गणेश मुर्ती शाळेचे छप्पर देखील जीर्ण झालेले आहे. हे छप्पर कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश मुर्ती शाळेत गणपती ठेवल्यानंतर यदाकदाचित छप्पर पडले तर गणेश मूर्त्यांचे नुकसान व विटंबना होणार आहे. गणेश चतुर्थी सण हा जवळच असल्याने तयार झालेल्या गणेश मुर्त्या ठेवण्यास संबंधित मूर्तिकाराला जागा अपुरी पडत आहे. त्यांच्या “भवानी कला केंद्र” या गणेश मूर्ती शाळेच्या जवळच शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा आहे.
सदरची शाळा ही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी सण साजरा होईपर्यंत ही शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा तयार झालेल्या गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी भाडयाने मिळावी, अशी मागणी आप्पाजी तारी यांनी केली होती. गणेश चतुर्थी सण झाल्यानंतर सदरील शाळा आम्ही स्वच्छ व टापटीपपणे खाली करून देवू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती. भाजपाचे प्रदेश सचिव दत्ता सामंत यांनी या मागणीकडे जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे लक्ष वेधून तारकर्लीतील मत्सव्यवसाय शाळेची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यानुसार जि. प. अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.