प्रतिनिधी / बेळगाव
बिजगर्णी येथील सर्व्हे क्रमांक 308 ही जमीन गायरान म्हणून राखीव होती. मात्र या जमिनीवर काही जणांनी नावे दाखल करून घेतली आहेत. कावळेवाडी गावासाठी ही गायरान जागा राखीव ठेवली होती. ग्रामस्थांकडे जमिनीचा कब्जा होता. मात्र काही जणांनी आपली नावे दाखल करून घेतली आहेत. त्यामुळे म्हणणे मांडण्यासाठी प्रांताधिकाऱयांनी शेतकऱयांना सांगितले.
त्यानुसार गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात शेतकऱयांनी आपले म्हणणे मांडले आहे. कुरुंदवाड सरकारची ही जागा होती. त्यानंतर एका व्यक्तीच्या नावे जागा करण्यात आली. मात्र ती जागा आता विकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रांताधिकाऱयांकडे हा खटला सुरू आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडले आहे. ऍड. एम. सी. काडापुरे ग्रामस्थांतर्फे काम पाहत आहेत. कावळेवाडीसाठी ही 18 एकर जागा राखीव आहे. तशी गावच्या कब्जात आहे. त्यामुळे ही जागा गावासाठीच ठेवावी, अशी मागणी केली आहे. यावेळी ऍड. नागदेव मोरे, ग्रामस्थ कमिटी चेअरमन जोतिबा मोरे, कल्लाप्पा येळ्ळूरकर, मोनाप्पा येळ्ळूरकर, अनंत बाचीकर, केदारी कणबरकर, देवेंद्र गौडा, रघुनाथ मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.