प्रतिनिधी / कुरुंदवाड
पाणीपुरवठा उपसापंप दुरुस्ती होऊन सुद्धा झालेल्या कामाची निविदा काढल्याबद्दल शिवसेना कुरुंदवाड शहर प्रमुख राजू आवळे यांनी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नगरसेवक व प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे धाव घेऊन ह्या झालेल्या कामाच्या निविदेला स्थगिती द्यावी अशी विनंती अर्जाद्वारे केली होती. त्या तक्रार अर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीरपणे दखल घेत या तक्रारी संदर्भात स्वयंस्पष्ट विनाविलंब अभिप्राय देण्याचे पत्र मुख्याधिकारी नगर परिषद कुरुंदावाड यांना दिल्याने पालिका प्रशासनाचा स्वच्छ कारभाराविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
राजू आवळे यांनी याआधी एका निवेदनाद्वारे पंप नादुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. त्या निवेदनावर न. प. च्या मुख्याधिकाऱ्यानी दिनांक ९ एप्रिल २०२०च्या पत्रान्वये सदरचे काम हे आपत्कालीन असल्याने ते करून घेतले आहे व रीतसर बिल अदा केले नसल्याने रीतसर मार्गाचा अवलंब करून ते देणे गरजेचे आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून ते देण्याचे असलेने निविदा प्रक्रिया राबवीत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ह्या पत्रावरून सदरचे काम हे आधीच करून घेतल्याचे उघड झाले आणि तसे मुख्याधिकारी यांनीच ह्या पत्रान्वये कबुल केले आहे. त्यामुळे माझ्या म्हणण्याला ह्यामुळे पुष्टी मिळत आहे. झालेल्या कामाची निविदा काढायची पद्धत अथवा तरतूद न. प. कायद्यात नाही. त्यामुळे ही निविदा पूर्णपणे बेकायदेशीर व चुकीची ठरते असे आवळे यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे.
सध्या महाराष्ट्र व सबंध देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असताना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी गावात काळजी घेण्याचे सोडून असे टेंडर काढायचे कसे काय सुचते प्रशासनाला? सर्व नागरिक कोरोनाच्या महामारीच्या साथीच्या काळजीत असताना परस्पर छुप्या पद्धतीने हे टेंडर प्रसिद्ध केले जाते जेणेकरून ह्या कालावधीत कोणीही नागरिक ह्या टेंडर ला विरोध करण्यास येणार नाही कारण सध्या जमावबंदीचा आदेश जिल्ह्यात लागू आहे. याबाबत मी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील कलम ३०८ च्या तरतुदी प्रमाणे निविदा प्रक्रिया दिनांक ३.४.२०२० रोजी प्रकाशित झालेल्या सर्व निविदा प्रक्रियेस स्थगिती देणेसाठी विनंती या अर्जाद्वारे केलि होति
त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन क्रमांक कार्यासन ११/न.पा./आर आर /१४४/२०२० त्या संदर्भ पत्रांने त्वरित स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याविषयी सांगितले आहे. यामुळे पालिका वर्तुळात व शहरात जोरदार चर्चा सुरू आहे