पुन्हा काही दिवस रहावे लागणार हिंडलगा कारागृहात
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिक तरुणांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर त्या तरुणांच्या वकिलांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्या तरुणांना पुन्हा काही दिवस कारागृहातच रहावे लागणार आहे. मराठी भाषिक तरुणांना त्रास करण्याचा विडाच सरकारने उचलला आहे. त्यामुळेच या सर्व तरुणांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी आठवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये जामीन अर्जावर वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान बेंगळूर येथे झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यावेळी दगडफेक केली म्हणून खोटे गुन्हे मराठी भाषिक युवकांवर घालण्यात आले. त्यानंतर राज्यद्रोहसारखा 124 (अ) हा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नाहक त्रास देण्यासाठी सरकार आणि येथील प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी जामीन मिळेल अशी आशा होती. मात्र जामीन नाकारल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
येथील सरकार मराठी भाषिकांना लक्ष्य बनवित आहे. अनेक खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जात आहेत. पोलिसांनी 38 मराठी भाषिकांना अटक करुन कारागृहात डांबले आहे. तर आणखी 23 हून अधिक जणांवर गुन्हे आहेत. अटक झाली नसलेल्या तरुणांनीही अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. ते अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत. एकूणच या तरुणांना नाहक त्रास देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या खटल्यात ऍड. महेश बिर्जे, ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. प्रताप यादव, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. आर. एन. नलवडे हे काम पाहत आहेत.