प्रतिनिधी / मिरज
शनिवारी मध्यरात्री गोविंदा व्यंकटेश मुत्तीकोल (वय 35) या तरुणाचा झालेला खून हा त्याच्याच दारुड्या मित्रांनी अवघ्या साडेचारशे रुपयांसाठी केला असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शक्ती मधूकर खाडे (वय 30, रा. मराठी मिल चाळ, समतानगर), मिलिंद घनश्याम सादरे (वय 52, रा. पाटील दवाखान्यामागे माणिकनगर) या दोघांना महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून केवळ सहा तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.
गोविंद आणि त्याची आई व भाऊ हे तिघेजण समता नगर येथे राहण्यास आहेत. शनिवारी रात्री 11 वाजता मिलिंद, शक्ती आणि मयत गोविंद हे तिघेजण दारू पिण्यास गेले होते. तेथे त्यांचे पैशांच्या देवाण-घेवणीतून भांडण झाले. गोविंद याने सदर दोघांना साडेचारशे रूपये उसने म्हणून दिले होते. मात्र, दारू पिताना त्यांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाल्याने घरी परत जात असताना, त्याच्या दोघा मित्रांनीच त्याचा काटा काढला. डोक्यात दगड घालून तसेच धारधार हत्याराने गळा चिरून हा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. केवळ साडेचारशे रुपयांसाठी मित्राचा निर्घृण खून झाल्याने माणिकनगर आणि समतानगर भागात घबराट पसरली आहे.