उगरगोळ ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
उगरगोळ (ता. सौंदत्ती) ग्रा. पं. ला 1097 एकर जमीन गायरान म्हणून होती. मात्र त्यामधील 150 एकर वगळून ती सर्व जमीन श्री रेणुकादेवी ट्रस्टला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे. ट्रस्टचे चेअरमन हे जिल्हाधिकारी आहेत. आणि त्यांनीच हा निकाल दिला आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे, तेव्हा निकाल दिलेल्या खटल्याची नोटीस आम्हाला तातडीने द्यावी, अशी मागणी उगरगोळ येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उगरगोळ ग्राम पंचायतीच्या अखत्यारीमध्ये आणखी दोन गावे येतात. एकूण 28 ग्रा. पं. चे सदस्य आहेत. जवळपास 20,000 लोकसंख्या आहे. या गावांमध्ये शेतकरी आहेत. असे असताना अचानकपणे जिल्हाधिकाऱयांनी निकाल देऊन ती जमीन ट्रस्टला दिली आहे. त्यामुळे गायरान जागाच ग्राम पंचायतीकडे शिल्लक नाही. तेव्हा ग्रा. पं. ला सर्व जमीन राखीव ठेवावी, अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे.
सध्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांकडे हा खटला सुरू होता. त्यांनी हा निकाल दिला आहे. मात्र आम्हाला निकालाची प्रत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता आम्ही त्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी निंगनगौडा काळगौडर, एम. सी. रायनगौडर, परसाप्पा इमरापूर, संतोष कलाल, देनाप्पा बजंत्री, निलाप्पा सिद्दप्पनवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.