विविध दलित संघटनांचा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रायचूर येथील जिल्हा न्यायाधीशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
रायचूर येथील जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा हे ध्वजारोहण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटवावी, अशी सूचना केली. ती प्रतिमा हटविल्यानंतरच ध्वजारोहण करू, असे सांगितले. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला आहे. एका न्यायाधीशाने अशाप्रकारे विरोध करणे हे समाजाला काळिमा फासणारी घटना आहे. तेंव्हा संबंधित न्यायाधीशांवर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
…अन्यथा आंदोलन करू
महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांचाच अशाप्रकारे अवमान होत आहे. तेही एका जबाबदार व्यक्तीकडून ही गंभीर बाब झाली आहे. न्यायाधीश मल्लाकार्जुन गौडा यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. समता सैनिक दल, जयभीम टायगर्स युवा संघटना यांच्यासह विविध दलित संघटनांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.
यावेळी अनिल कांबळे, भरमा कांबळे, महांतेश तळवार, महादेव तळवार, आनंद कोलकार, अनुराग कुरंगी, अनुराग देवरमनी, अभिषेक देवरमनी, आकाश कांबळे, नागराज कडकाल, राजेश वडगावी, श्रीनिवास तळवार, राहुल कांबळे, राहुल हट्टीहळ्ळी, परशुराम शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.