मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची टीकाः रुग्ण तडफडत असताना शिवसेनेची गाजावाजा केलेली रुग्णवाहिका कुठे? : आमदारांनी कोरोना काळात तरी नौटंकी थांबवावी!
प्रतिनिधी / मालवण:
आमदार वैभव नाईक यांचा सहा वर्षांतील कारभार म्हणजे केवळ फोटोसेशन आणि प्रसिद्धी एवढाच आहे. त्यापलीकडे त्यांचे काही काम नाही. कोरोना काळातही त्यांची नौटंकी थांबलेली नाही. त्यांच्या मतदारसंघात रुग्णवाहिकेअभावी कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू होतो. ही दुर्दैवी घटना आमदारांचा अपयशी कारभार स्पष्ट करणारी असल्याची टीका मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने जर मृत्यू होत असतील तर शिवसेनेने मालवणात शोबाजी करून लोकार्पण केलेली रुग्णवाहिका दिखावा म्हणून आणली होती का? असा सवाल देखील सांडव यांनी उपस्थित केला आहे.
मालवणात डॉक्टर दिवस-रात्र सेवा देत आहेत. डॉक्टर-आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, ज्या रुग्णालयात डायलेसीस मशीन वर्षभर धूळ खात पडतात. त्याची जोडणी पूर्ण होत नाही. अशा दिशाहीन कारभारात, अपुया साधन समुग्रीत डॉक्टरांनी प्रामाणिक सेवा बजावली तरी अपुऱया व्यवस्थेमुळे रुग्ण रामभरोसेच आहेत, असेच म्हणावे लागेल. जसा आमदारांचा कारभार तसाच मालवण पालिकेतील सत्ताधाऱयांचा कारभार सुरू आहे. नगराध्यक्ष यांचा कोणताही लक्ष कोरोना रुग्णांच्या सेवा सुविधांकडे नाही, असेच चित्र शहरात आहे. एखाद्या रुग्णाला 5 तास रुग्णवाहिका मिळत नाही, रुग्ण तडफडतो अशावेळी पालिकेचे कोणतेही कर्तव्य नाही का? ओरोसवरून रुग्णवाहिका येणार याची वाट पाहत रुग्णाने तडफडायचे आणि नातेवाईकानी बघायचे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. शासनाने कोरोना काळात सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदारांना 21 लाख निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी काही निधीतून प्रशासन कार्यालयात केवळ टेबल खुर्ची यांचीच खरेदी आमदारांनी केली का? याबाबत आमचे वरिष्ठ माहिती घेत आहेत. मात्र, जनतेचे जीव वाचवण्यासाठी यातील निधी खर्च झाला आहे की? असा सवाल करीत ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावते. त्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनसे त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. एकूणच शनिवारी मालवणात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. मुलगा पॉझिटिव्ह, आईचा तडफडून मृत्यू? याला कोण जबाबदार आणि कोणावर गुन्हे दाखल व्हावेत, हे जनतेनेच सांगावे. आमदारांनी नौटंकी बंद करून जनतेचा आवाज ओळखावा, असे त्यांनी म्हटले आहे.
शवपेटी काय कामाची?
कोरोना काळात मृत्यू दर वाढत आहे. आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. अशा स्थितीत जास्तीत-जास्त आरोग्य सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी आमदारांनी मालवणात शवपेटी दिली. आमदारांना माणसे जगवायची आहेत की मारायची? शवपेटीपेक्षा आता अधिक रुग्णवाहिका महत्वाच्या आहेत. हे आमदारांनी ओळखावे, असे विनोद सांडव यांनी म्हटले आहे.