शालांत परीक्षा रद्द होण्यात महत्वपूर्ण योगदान
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सुरू असलेल्या कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर शालांत मंडळाच्या परीक्षा रद्द कराव्या या मागणीसाठी आंदोलन केलेल्या व नंतर पोलिसांकडून अटकसुद्धा करून घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आम आदमी पक्षाने अभिनंदन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सरकारला परीक्षा रद्द कराव्या लागल्या, असे पक्षाने म्हटले आहे.
पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्त्या सिसिल रॉड्रिग्स यांनी हे विजयी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. त्यावेळी पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष निखील हळदणकर उपस्थित होते. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही सरकार परीक्षा रद्द करण्याच्या मनस्थितीत नव्हते. सीबीएसीसह अनेक राज्यांनीही आपल्या परीक्षा रद्द केल्या. परंतु गोवा सरकार मात्र परीक्षा होणारच म्हणत होते. या प्रकाराला राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचा विरोध होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध सामाजिक माध्यमांवरून एक ऑनलाईन जागृती मोहीम चालविली होती. त्याशिवाय गोवा शिक्षण मंडळ तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनेही केली होती. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना अटक करण्याचा प्रकारही घडला होता. मात्र विद्यार्थी आपल्या निर्णयाशी ठाम राहिले होते. त्यांच्या या प्रयत्नांना आम आदमी पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळेच शेवटी सरकारला नमते घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
या सर्व प्रकाराचे श्रेय या विद्यार्थ्यांनाच जात आहे, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले. भविष्यातही आम आदमी पार्टी सदैव या विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहणार आहे, व त्यांच्या मदतीसाठी धावून येणार आहे, असे आश्वासन रॉड्रिग्स यांनी दिले.
दरम्यान, परीक्षा रद्द होण्याच्या या प्रकारात आम आदमी पक्षाचे कोणतेही योगदान नाही, त्यांनी फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नये, असे पत्रक एका विद्यार्थी संघटनेने जारी केले आहे, त्याबद्दल रॉड्रिग्स यांनी खंत व्यक्त केली आहे. परंतु खरा प्रकार काय आहे त्याबद्दल तमाम गोमंतकीयांना जाणीव आहे, त्यासंबंधीचे अनेक पुरावेही आहेत, व्हीडिओ आहेत. त्यावरून कोण खरे आणि कोण खोटे ते जनताच ठरवेल, असे रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.