रणरागिणींची तातडीने केली सुटका
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेसमोर भगवा ध्वज फडकविण्यासाठी महिला रणरागिणी गेल्या होत्या. माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे यांच्यासह महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जि.पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेऊन तातडीने त्यांची सुटका करा, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सुटका करण्यास सांगितले. लोकशाही मार्गाने मराठी भाषिक आंदोलन करत आहेत. बेकायदेशीररीत्या लाल-पिवळय़ा रंगाचा अनधिकृत ध्वज उभा करण्यात आला आहे. तो हटविण्यासाठी म. ए. समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. छुप्या मार्गाने या महिला भगवा ध्वज घेऊन मनपाकडे गेल्या. त्यांना तातडीने पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अशाच पद्धतीने जर त्यावेळी कन्नड भाषिक तरुणांना अटक केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती, असे यावेळी सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. जिल्हाधिकाऱयांनी तातडीने या सर्वांची सुटका करण्यासाठी फोन केला. यावेळी आर. आय. पाटील, महेश जुवेकर, विजय शिंगोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.