सातारा / प्रतिनिधी :
कोरोना महामारीमध्ये प्रशासनाच्या विरोधात कोणीही ब्र शब्द काढायचा नाही. अशी भितीच प्रशासनाकडून घातली गेल्याने कोणीही विरोधात बोलत नाही. त्याचाच गैरफायदा घेत प्रशासनाकडून अनेक घोटाळे या कोरोना महामारीच्या काळात सुरु आहेत. ‘तरुण भारत’च्यावतीने अचूक बातमीच्या माध्यमातून गेल्या पंधरा महिन्यामध्ये ते उघडकीस आणले आहेत. नुकताच मृत्यूच्या आकडा उशीरा अपलोड केल्याचा घोटाळा उघडकीस आणला. ज्या रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला आहे अन् त्याची माहिती भरली गेली नाही. त्या रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहे. दरम्यान, त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचाही समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात प्रशासनाकडून मागच्या तारखेचे आकडे भरल्याने बाधितांची संख्या जास्त दाखवल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन लादला गेल्याचा प्रकार ‘तरुण भारत’ने उघडकीस आणला. जिल्ह्यावर लॉकडाऊन काळात अन्याय कसा होतो, याचा पर्दाफाश तरुण भारतच्यावतीने करण्यात आला. प्रशासनाकडून एका बाजूला उपाययोजना सुरु असल्या तरी दुसऱ्या बाजूला चुका होत आहेत. ज्या चुका घडत आहेत, त्या चुकांमुळे सातारा जिल्हावासियांना उगाच बंधनात रहावे लागत आहे. गेल्या पंधरा महिन्यांमध्ये लॉकडाऊन काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गेल्या पंधरा महिन्यांमध्ये अचूक बातमीच्या माध्यमातून सातारकरांना तरुण भारतच्या वाचकांना अचूक माहिती दिली गेली आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी अचानक मृत्यूदर वाढला गेला. दि. 28 रोजी मृत्यू संख्या 46 दाखवण्या आली. याबाबत तरुण भारतने माहिती घेतली असता मागच्या तारखेला मृत्यू झालेल्यांची नोंद असताना त्या तारखेला नोंद करण्यात आली आहे. तरुण भारतने या घोटाळयाचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून ज्या रुग्णालयांनी माहिती अपलोड करण्यास उशीर केला त्या रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरु आहे.