समाज सुधारणा युवक मंडळाच्यावतीने ग्रामपंचायतला निवेदन
वार्ताहर /किणये
मुचंडी येथील समाज सुधारणा युवक मंडळाच्यावतीने त्या धोकादायक विहिरीवर जाळी बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गेल्या आठवडय़ात या विहिरीत एका दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला तर चार वर्षांपूर्वीही एक मुलगा या विहिरीत बुडाला होता. दोन बालकांचा बळी गेल्यामुळे विहिरीवर जाळी व विहिरीच्या बाजूने संरक्षक कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिरालगत मुचंडी ते मुतगा संपर्क रस्त्याच्या बाजूला ही विहीर असून परिसरात नागरिकांची घरे आहेत. लोकवस्तीच्या ठिकाणी ही खासगी मालकीची विहीर आहे.
सध्या या विहिरीत बऱयापैकी पाणी असून त्याचा वापर सुरू आहे, ही जमेची बाजू असली तरी काही तरुण या विहिरीत पोहण्यासाठी येतात.
उघडय़ावर असणारी ही विहीर धोकादायक असून यात दोन बालकांचे बळी गेलेले आहेत. ग्रा. पं.ने तातडीने विहिरीवर जाळी बसवावी व विहिरीच्या बाजूला संरक्षक कठडा बांधावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रा. पं. पीडीओ अभिनंदन व्हसगौडर, उपाध्यक्ष संदीप जकाणे, सिद्धू वडीयर, लक्ष्मण बुड्री, निंगाप्पा चौगुले आदींच्याकडे निवेदन देण्यात आले.