खानापूर तालुका क्रांतिसेनेतर्फे शिवपुतळा विटंबनेचा निषेध
प्रतिनिधी /खानापूर
भारतीयांचे आराध्यदैवत असणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळूर येथील शिवपुतळय़ाची काही समाजकंटकांनी विटंबना केली. ही अत्यंत निंदनीय घटना असून याला कारणीभूत असलेल्यांना ताडतीने पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच या कृत्याचा क्रांतिसेना तीव्र निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदन क्रांतिसेना अध्यक्ष महादेव मरगाळे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, समाजात जातीय, धार्मिक व भाषिक तेढ निर्माण करणाऱया प्रवृतींना वेळीच आवरण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने त्वरित या दृष्ट प्रवृतीच्या माणसांना पकडून कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई करावी, बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विशेषतः मराठा आमदारांनी या प्रकरणी आवाज उठवून संबंधितावर कडक कारवाई करण्यात राज्य शासनाला भाग पाडावे, युगपुरुष शिवरायांची बदनामी एक मराठा म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाही. आजही भारतीय सैन्यदलात व जगभरात शिवरायांच्या गनिमी काव्याविषयी शिकविले जाते, कर्नाटकातील कोप्पळच्या स्वातंत्र्यासाठी मराठय़ांनी रक्त सांडले आहे. बेळवडीच्या मल्लम्मा (सावित्रीबाई देसाईंना) त्यांचे जिंकलेले राज्य बहीण मानून तिच्या मुलाच्या दूधभाताच्या व्यवस्थेसाठी सोडून दिले होते. याचाही विसर कर्नाटकातील समाजकंटकांना पडलेला दिसतो आहे. सरकारने त्वरित हालचाल करून शिवपुतळय़ाची विटंबना करणाऱया व्यक्तीस कडक शासन करावे, अन्यथा शिवरायांचे मावळे शिवशाहीच्या शिरस्थाप्रमाणे या समाजकंटकांना शासन करण्यास समर्थ आहेत, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिवपुतळय़ाची विटंबना करणाऱयांवर कारवाई करा : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची मागणी
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची केलेली विटंबना हा अत्यंत निंदनीय प्रकार असून यामध्ये सहभागी झालेल्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापणेसाठी दिलेल्या योगदानाला तोड नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श संपूर्ण जगातील लोक घेतात. त्यांच्या पुतळय़ाचा अवमान होणे म्हणजे संपूर्ण देशवासियांचा अवमान असल्याने अशा समाजकंटकी प्रवृत्तीचा राज्य शासनाने विरोध करावा, असे मतही आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले.