ऑनलाईन टीम / कोलकाता :
तृणमूल काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदारांची घरवापसी रोखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काल सायंकाळी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदु अधिकारी यांनी पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. या भेटीत भाजपच्या 74 आमदारांपैकी 24 आमदार गैरहजर होते. नवनिर्वाचित आमदारांना सुवेंदु अधिकारी यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच हे आमदार या भेटीवेळी गैरहजर राहिले असून, ते घरवापसी करणार का? अशा प्रश्नांना उधाण आले आहे.
मागील आठवडय़ात मुकुल रॉय यांची भाजपातून तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. त्यानंतर दीपेंदु विश्वास, सुभ्रांशु रॉय, राजीव बॅनर्जी यांच्यासह अन्य नेतेही पुन्हा तृणमूलमध्ये परततील असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानंतर तृणमूलमधील काही नेत्यांनी भाजपाचे 30 आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काल सायंकाळी झालेल्या राज्यपाल भेटीत भाजपचे 24 आमदार गैरहजर होते. तेव्हापासून बंगाल भाजपमध्ये फुट पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.