ऑनलाईन टीम / पुणे :
विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास, नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात तब्बल 25 हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. सुलभा देशमुख, मधू शितोळे फुलांच्या रांगोळीची तर, ॠषिकेश मोरे, प्रविण घुले, तुकाराम जाधव, गुरुनाथ चव्हाण यांनी दीपोत्सवातील पणत्यांची आरास केली.
महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून निरोगी भारताचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. दीपोत्सवात मंदिरातर्फे कुठेही प्लास्टिकचा वापर होणार नाही, सर्व गोष्टी पर्यावरणपूरक असतील याकडे लक्ष देण्यात आले होते़.
ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, पाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली करण्यात आली. त्यानंतर आलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने दीपोत्सव साजरा करीत आहोत. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. निरोगी भारत सशक्त भारत होण्याच्या दृष्टीने देखील आम्ही देवीकडे प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.