पुढील दोन दिवस किमान तापमानात वाढ
पुणे / प्रतिनिधी :
पुढील दोन दिवसांत मध्य भारत तसेच पश्चिम भारतातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडीची हुडहुडी कमी होणार आहे. दरम्यान, राज्यात सोमवारी जळगावात सर्वात कमी 11.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात गेल्या आठवडय़ात थंडीने हुडहुडी भरविली होती. मुंबईसह किनारी भागात पारा खाली घसरला होता. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट होती. रविवारपासून थंडी पळाली असून, अनेक शहरांतील पारा वाढला आहे. पुढील दोन दिवस मध्य भारत तसेच पश्चिम भारतात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे, तर वायव्य भारत व पूर्व भारतात किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. राज्यात दोन दिवसांनंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)
कुलाबा 19.3, सांताक्रूझ 17.6, अलिबाग 18.9, रत्नागिरी 20, पणजी 22.3, डहाणू 16.9, पुणे 13.8, नगर 13.6, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 14.9, मालेगाव 12, नाशिक 12.7, सांगली 17.4, सातारा 16, सोलापूर 18.5, उस्मानाबाद 12.9, औरंगाबाद 12.5, परभणी 14.5, नांदेड 16, बीड 16.8, अकोला 13.5, अमरावती 12.8, बुलढाणा 13.5, ब्रह्मपुरी 12.4, चंद्रपूर 15.4, गोंदिया 12.5, नागपूर 11.7, वाशिम 14.6, वर्धा 13.6, यवतमाळ 14.4.