प्रतिनिधी/ सातारा
मंगळवार पासून पडणाऱया पावसाने ऐन थंडीत गारठा आणखी वाढविला. रविवारी पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता. परंतु तापमान घटल्याने पारा 26 अंशावर येवून पोहचला आहे. यामुळे थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.
थंडीचा महिना नुकताच सूरू झाला होता. थंडीचा जोर कमी जाणवत होता. परंतु दिवसा कडक ऊनामुळे चटके बसत होते. तोच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला. मंगळवारपासून शनिवार पर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सतत पावसाची रिपरिप सुरू होती. तोच रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता. यात सायंकाळी प्रचंड थंडी जाणवू लागली. दुपानंतर घराबाहेर पडताना सर्वजण उबदार कपडे परिधान करत होते. रात्री 7 नंतर बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. फक्त किरकोळ साहित्य खरेदी सुरू होती. जागोजागी शेकोटय़ा पेटवण्यात येत आहेत. वयोवृद्ध हे घराबाहेर पडणे टाळत आहेत. पाऊस थांबला तरी थंडीचा जोर वाढला आहे. रविवारी पारा 26 अंशावर पोहचला होता. तो आणखी कमी होणार असल्याचे हवामान खात्याकडून अंदाज वर्तविला जात आहे. थंडीमुळे अंगदुखी, सर्दी, खोकला या साथीच्या आजारात वाढ होत असल्याने डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.