प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात प्रतिष्ठीत अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. साताऱयाला कुस्तीची परंपरा आहे. ती परंपरा जोपासली गेली पाहिजे. आपण कुस्ती खेळणाऱया मल्लांना मदत करतो, कुस्ती स्पर्धेसाठी मदत करतो. परंतु जे मल्ल आपलं उमेदीचे आयुष्य कुस्तीसाठी वेचतात. त्यांना वार्ध्यक्याच्या काळात शासनाने मदत करायला हवी. कुठे तरी त्यांना पद द्यायला हवे, अशी भूमिका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी मांडली. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्पर्धेबरोबरच जिल्हा तालिम संघासाठी सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही दिली. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नियोजनाबाबत कौतुक केले. साहेबराव भाऊ यांचे मात्र हा सोहळा पाहून ऊर भरुन आले. दरम्यान, सायंकाळच्या मंद गार वाऱयाच्या झुळकात कुस्तीचा थरार सुरू झाला अन् कुस्तीप्रेमींमध्ये जल्लोष वाढू लागला. 57, 70, 92 वजनगटातील माती व गादी विभागातील कुस्त्या सुरू झाल्या. यातील बऱयाच कुस्त्या चटकदार झाल्या. त्या पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.
64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन छ. शाहु क्रीडा संकुलात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रारंभ झाला. यावेळी कुस्तीगिर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबरावभाऊ पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्हाधिकारी sशेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामराजे म्हणाले, अनेक मल्ल साताऱयाच्या मातीने घडवलेले आहेत. श्रीरंग अप्पा हे फलटणचे होते. ते माहुलीला नंतर आले. सातारा तालिम संघात त्यांनी सराव केला. साताऱयाची कुस्तीची परंपरा आपण जपली पाहिजे. नुसते कुस्ती खेळणाऱयांना मदत करुन चालणार नाही तर ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी घालवलं अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे. बाळासाहेब तुम्ही यात लक्ष घालाल, अशी विनंती त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, बाळासाहेब लांडगे आणि सातारचे नाते वेगळे आहे. हल्ली त्यांचे प्रेम कमी झाले आहे. ते पुण्यात भेटत नाहीत. या स्पर्धेमुळे सातारकरांना आनंद होत आहे. कलेक्टर साहेब आणि एसपी साहेब यांच्या शिस्तीमुळे शेवटी कुस्ती बघायला मिळेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, बऱयाच वर्षानंतर साताऱयात महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होत आहे. शरद पवार साहेबांनी सांगितले की माझ्या साताऱयात स्पर्धा झाली पाहिजे, म्हणून ही स्पर्धा होत आहे. आपल्यातील काही मल्ल उत्तर भारतात जातात. तेथे मेहनत घेतात. कुस्तीचे महत्व मोठे असल्याचे सांगत पुढे ते म्हणाले, 9 तारखेला अंतिम लढत होणार आहे. जिह्यातील मल्लांचे अभिनंदन आणि दीपक पवार यांनी खूप कष्ट घेतले, असेही त्यांनी कौतुक केले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1963 साली साताऱयात झाली होती. त्यानंतर आता शरद पवार साहेबांच्या मान्यतेने सातारा जिह्याला बहुमान मिळाला आहे. डोळ्याचे पारणे फिटेल अशा कुस्त्या पहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य या स्पर्धेला राहील, अशी ग्वाही देत पुढे म्हणाले, सातारा जिह्याला कुस्तीची वेगळी परंपरा आहे. खाशाबा जाधव असतील, श्रीरंग अप्पा असतील कितीतरी नाव घेता येतील. त्यांनी साताऱयाचे नाव कुस्तीत केले आहे. खाशाबा जाधव यांच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालीम संघाची इमारतीसाठी त्याकाळी लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी जागा दिली. आता याच तालिम संघाच्या इमारतीसाठी माझ्याकडून प्रयत्न सुरु आहेत. मागच्या पंचवार्षिक नियोजनमधून पहिल्या टप्यासाठी निधी दिला होता. ते काम पूर्ण झाले. दुसऱया टप्याकरता निधीची तरतूद करत आहोत. असे सांगत ते म्हणाले, क्रीडा संकुलाचे भाडे भरायला लागेल असे मला कळताच मी मंत्री केदार यांना फोन लावला. नाईक तुम्हाला एकाएकी फोन आलेला नाही, असेही त्यांनी आर्वजून सांगितले. या स्पर्धेंसाठी व जिल्हा तालिम संघासाठी जिह्यातील सगळे आमदार प्रयत्न करतील, जसे कोल्हापूर नाव आहे तसे साताऱयाचे नाव राहील यासाठी प्रयत्न करूयात. सातारा तालीम संघासाठी तुम्ही नाही म्हणाला तरीही प्रयत्न करणे हा माझा हक्क आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुधीर पवार यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब लांडगे यांनी आभार मानले.