प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील विविध समुद्रकिनाऱयांवर एकाच दिवशी आंघोळीसाठी उतरलेल्या तब्बल आठ पर्यटकांना लाईफगार्डने वाचविले आहे. त्यात महिला अधिक होत्या. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात आले आहेत. गुरुवारी समुद्रकिनाऱयांवर बुडणाऱया पर्यटकांना वाचविण्यास लाईफगार्डंना यश आले आहे. सरकारने समुद्रकिनाऱयांवर लाईफगार्ड नेमण्यासाठी कंत्राट दिलेल्या खाजगी कंपनीच्या प्रवक्त्याने वरील माहिती दिली आहे.
दक्षिण गोव्यातील पाळोळे समुद्रकिनाऱयावर गुरुवारी 3 पर्यटकांना बुडतांना वाचविले. यात दिल्लीतील एका 29 वर्षीय महिलेचा, हरियाणा येथील 27 वर्षीय महिला तर कोलकाता येथील 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पाळोळेपासून काही अंतरावर असलेल्या गालजीबाग नदीत बुडत असलेल्या दोन गोमंतकीयांना वाचविण्यात आले आहे. त्यात 50 व 10 वर्षीय पितापुत्राचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश येथील 38 वर्षीय महिलेला वार्का समुद्रकिनाऱयावर बुडताना वाचविले आहे. दोन महिलांना उत्तर गोव्यातील आश्वे समुद्रकिनाऱयावर बुडताना वाचविण्यात आले. राज्यात पर्यटक मोठय़ा प्रमाणात आले असल्याने दोन्ही जिह्यातील समुद्रकिनाऱयांवर अतिरिक्त जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले