प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरवासियांसाठी जिव्हाळाचा विषय असणाऱया काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेचे काम मेपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कोरानामुळेच काम रखडल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिकेसंदर्भातील विविध विषयांसंदर्भात ताराबाई पार्क येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात आढावा बैठक झाली. यानंतर ते पत्रकरांशी बोलत होते. आमदार चंद्रकांत जाधव, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
पालकमंत्री पाटील म्हणाले, काळम्मावाडी धरणातून थेटपाईपलाईनने पाणी मिळावे, अशी कोल्हापूर वासियांची अनेक वर्षाची मागणी होती. तत्कालिन केंद्र आणि राज्यशासनाकडून ही योजना मंजूर करून आणली. कोरोनामुळे प्रकल्प रेंगाळला. परंतू आता प्रकल्पाचे काम गतीने करण्याचे नियोजन आहे. पाईपलाईनचे 3 किलोमीटरचे काम बाकी असून ते पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. जॅकवेलच्या कामासाठी डी वॉटरींगचे काम पुढील महिन्यांपासून सुरू होणार आहे. येथील राफ्टच काम एप्रिलपर्यंत होईल. येथे 175 कर्मचारी नेमून काम केले जाणार आहे. इनटेक वेलच्या पाईपलाईनचे काम सुरू होत आहे. 30 किलोमीटर महावितरण लाईन टाकण्यात येणार असून यापैकी 12 किलोमीटरचे काम झाले आहे.