विनोद सावंत/कोल्हापूर
शहरातील थेट गॅसपाईपलाईन योजनेचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे डिसेंबर 2021 पर्यंत होणार असून कोल्हापूर शहरातील 9 प्रभागात थेटपाईपलाईनने गॅस थेट घरात मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरामध्ये थेटपाईपलाईनने गॅस उपलब्ध होणार आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस नियमक (भारत सरकार) मंडळामार्फत थेट गॅसपाईपलाईन हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत पुणे ते बेंगलोर थेट गॅस पाईपलाईन जाणार होती. कोल्हापुरातील नागरिकांना याचा लाभ मिळावा म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठपुरवठा केला. त्यांच्यामुळे कोल्हापूर शहरासाठी ही योजना मंजूर झाली. यामुळे कोल्हापूर शहर तसेच इचलकरंजी येथील नागरिकांना पाईपलाईनने थेट घरात गॅस मिळणार आहे.
कदमवाडी, विजयनगर येथून 13 एप्रिल 2021 रोजी पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात शहरातील 9 प्रभागात नागरिकांना या योजनाचा लाभ होणार आहे. यानंतर पुढील टप्यात संपूर्ण शहर कव्हर केले जाणार आहे. मुंबई, पुणेनंतर आता कोल्हापुरातही गॅस कंपनी ते ग्राहक थेट गॅस सेवा सुरू होत आहे. नॅचरल गॅसमुळे प्रदूषण थांबणार असून घरगुतीसह रिक्षा, कार, बससह औद्योगिक वसाहतीसाठीही या गॅसचा वापर करता येणार आहे.
गॅस मिळणारे पहिल्या टप्प्यातील प्रभाग
भोसलेवाडी-कदमवाडी, कदमवाडी, शाहू कॉलेज, शिवाजी पार्क, सदर बाजार, महाडिक वसाहत, मुक्तसैनिक वसाहत, मार्केट यार्ड, रूईकर कॉलनी.
थेट गॅस पाईपलाईनचे फायदे
-24 तास गॅस उपलब्ध
-गॅसला नंबर लावणे, रांगेत उभा राहण्याची कटकट संपणार
-कंपनी ते ग्राहक सेवा असल्यामुळे वाहतुक खर्च वाचणार
– मिथेन स्वरूपात गॅस असल्याने गळती झाली तरी स्फोटचा धोका कमी
-प्रत्येक कनेकश्नला स्वतंत्र मीटर, जेवढा वापर तेवढेच बील
-ना टंचाई, ना चोरी
-सध्याच्या गॅस टाकीपेक्षा 10 ते 40 टक्के स्वस्त
ठेकेदार कंपनी -हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरशन व ऑईल इंडिया लि.
कोल्हापुरातील पहिल्या टप्प्यात काम– 70 किलोमीटर
केंद्र शासनाकडून निधी -280 कोटी
बुकींग रक्कम -118
पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबरमध्ये होणार
कोरोना, महापुरामुळे काही दिवस काम बंद ठेवावे लागले. आता पुन्हा कामाला गती आली आहे. पुढील काळात कोणताही अडथळा न आल्यास कोल्हापूर शहरातील पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. बी.एस. सोनवणे. प्रकल्प प्रमुख
कोरोना, महापूराचा कामाला फटका
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे राज्यशासनाने लॉकडाऊन केला. तसेच मागील महिन्यांत शहरात महापुर आला. या दोन्ही कारणांमुळे कामावर परिणाम झाला. बरेच दिवस काम बंद ठेवावे लागले. अन्यथा सहा महिन्यांतच काम पूर्ण झाले असते.