आर्हस (डेन्मार्क) / वृत्तसंस्था
आजपासून (शनिवार, दि. 9) खेळवल्या जाणाऱया थॉमस व उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात सायना नेहवाल, पुरुष दुहेरी गटात चिराग शेट्टी-सात्विकराज रणकिरेड्डी यांच्यावर भारताची मुख्य भिस्त असेल. यापूर्वी, सुदिरमन चषक स्पर्धेत भारताची कामगिरी खराब स्वरुपाची झाली. त्याची भरपाई येथे करण्याचा भारतीय बॅडमिंटनपटूंचा प्रयत्न असेल.
यापूर्वी सुदिरमन चषक स्पर्धेत काही स्टार खेळाडू उपलब्ध नसताना व काही वरिष्ठ खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्याचा भारताला फटका बसला होता. मागील आठवडय़ात झालेल्या त्या स्पर्धेत भारतीय संघ चीन व थायलंडविरुद्ध पराभूत झाले आणि त्यामुळे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले. मात्र, आता सायना व चिराग-सात्विक संघात परतल्याने ही भारतीय संघाची जमेची बाजू असणार आहे. या स्पर्धेत 5 खंडातील 16 अव्वल संघ सहभागी होत आहेत.
भारतीय पुरुष संघाचा थॉमस चषक स्पर्धेत चीन, नेदरलँड, ताहितीसह क गटात तर महिला संघाचा उबेर चषक स्पर्धेत थायलंड, स्पेन, स्कॉटलंडसह ब गटात समावेश आहे. पुरुष गटातील सलामी नेदरलँडविरुद्ध तर महिला गटातील सलामी स्पेनविरुद्ध होईल. 10 सदस्यीय पुरुष संघात एकेरीतील 4 व दुहेरीतील 3 पेयर्सचा समावेश आहे. बी. साई प्रणित, माजी अव्वलमानांकित किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, किरण जॉर्ज यांच्यासह दुहेरीतील चिराग-सात्विक, ध्रुव कपिला-एमआर अर्जुन, कृष्णप्रसाद-विष्णू वर्धन समाविष्ट आहेत.