वृत्त संस्था / ऍरहस (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या थॉमस चषक सांघिक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने तब्बल 11 वर्षांनंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने यापूर्वी 2010 साली उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मंगळवारी झालेल्या क गटातील लढतीत भारताने तैहैतीचा 5-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत गेल्या रविवारी झालेल्या लढतीत भारताने हॉलंडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. मंगळवारी तैहैतीवर मिळविलेल्या विजयामुळे भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. क गटातील भारताचा आता शेवटचा सामना बलाढय़ चीनविरुद्ध होणार आहे. चार संघांच्या क गटात आता भारताने पहिल्या दोन संघात आपले स्थान राखले आहे.
मंगळवारी झालेल्या भारत आणि तेहैती यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या बी. साई प्रणितने तेहैतीच्या लुईस बेबॉसचा केवळ 23 मिनिटात 21-5, 21-6 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव केला. दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या समीर वर्माने तेहैतीच्या रेमी रॉसीचा 41 मिनिटांच्या कालावधीत 21-12, 21-12 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱया एकेरी सामन्यात भारताच्या किरण जॉर्जने तेहैतीच्या मेब्लॅकचा 21-4, 21-2 अशा सरळ गेम्स्मध्ये केवळ 15 मिनिटात पराभव केला. भारताने यावेळी 3-0 अशी आघाडी मिळविली. पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या कृष्णा प्रसाद आणि विष्णुवर्धन यांनी तेहैतीच्या जोडीचा 21-8, 21-7 अशा सरळ गेम्समध्ये 21 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. या लढतीतील शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विकसाईराज रेनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तेहैतीच्या मेब्लॅक आणि ब्हॉनेट यांच्यावर 21-5. 21-3 अशी मात केली. 2010 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान येथे सुरू असलेल्या उबेर चषक सांघिक महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने मंगळवारी स्कॉटलंडचा 3-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.