वृत्तसंस्था /आर्हस (डेन्मार्क)
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलेल्या भारतीय संघाला शेवटच्या साखळी फेरीतील लढतीत बलाढय़ चीनकडून पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीअखेर भारतीय संघ चीननंतर दुसऱया स्थानी राहिला. आता शुक्रवारी डेन्मार्कविरुद्ध त्यांची उपांत्यपूर्व लढत रंगणार आहे.
चीनविरुद्ध शेवटच्या साखळी लढतीत फक्त सात्विकराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीलाच विजय मिळवता आला. त्यांनी प्रतिस्पर्धी हे जि तिंग-झोऊ हाओ डोंग यांच्याविरुद्ध 41 मिनिटात 21-14, 21-14 असा विजय संपादन केला. रणकिरेड्डी व शेट्टी यांच्या विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले. त्यापूर्वी झगडणाऱया किदाम्बी श्रीकांतला शि यू क्वीविरुद्ध 12-21, 16-21 अशा सरळ फरकाने पराभवाचा धक्का सोसावा लागला. ही लढत केवळ 36 मिनिटातच निकाली झाली. त्या तुलनेत समीर वर्माने मात्र लू ग्वांग जूला 1 तास 23 मिनिटे लढत दिली. या लढतीत त्याला 21-14, 9-21, 22-24 अशा फरकाने अपयशाचा सामना करावा लागला असला तरी त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. दुहेरीतील आणखी एक जोडी एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांना लिऊ चेंग-वँग यि ल्यू यांच्याकडून 24-26, 19-21 फरकाने अपयश झेलावे लागले.