अव्वल दर्जाचा भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचे प्रतिपादन, यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा जुलै-ऑगस्टमध्ये
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
थॉमस चषक जेतेपदाची आठवण अद्याप ताजी असली तरी या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱया चिराग शेट्टीने मात्र थॉमस जेतेपद विसरुन आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याकडे आपला कल असेल, असे म्हटले आहे. भारताच्या सर्वोत्तम डबल्स स्पेशालिस्टमध्ये समाविष्ट चिराग शेट्टीने थॉमस चषक जेतेपदात मोलाचे योगदान दिले होते. थॉमस चषक स्पर्धेला बॅडमिंटनमधील वर्ल्डकप म्हणून ओळखले जाते.
‘थॉमस चषक जेतेपद संपादन केले, तो पूर्ण आठवडा आताही संस्मरणात आहे. मात्र, आता पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्याने तयारीला सुरुवात करण्याची गरज आहे. राष्ट्रकुल स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धा यापुढील लक्ष्य असेल’, असे 24 वर्षीय चिराग वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.
‘मागील आशियाई स्पर्धेत आम्ही उत्तम कामगिरी साकारली होती आणि आता थॉमस चषक जिंकला असल्याने अर्थातच आमचे मनोबल उंचावलेले असेल. तेथे मिश्र गटातील सुवर्ण रिटेन करण्याची मोहीम असेल’, असे चिराग म्हणाला. भारताने यापूर्वी 2018 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र सांघिक गटात प्रथमच सुवर्ण जिंकले होते. चिरागला यंदाही या अव्वल कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
‘थॉमस चषक स्पर्धेत बराच संघर्ष करावा लागला, ते साहजिक होते. अव्वल दर्जाचे प्रतिस्पर्धी, संघ असल्याने त्यांचे आव्हान मोडीत काढणे कठीण होते. त्यामुळे, त्या स्पर्धेतील विजय भारतीय बॅडमिंटनमधील सर्वोत्तम ठरला. राष्ट्रकुलमध्ये मिश्र सांघिक इव्हेंटवर भर असतो. त्यामुळेही वैविध्य वाढते. मलेशियाचा संघ यंदाही मजबूत असेल. त्यांना महिला दुहेरी व मिश्र दुहेरीतील अव्वल खेळाडूंमुळे आमच्यापेक्षा सरस मानांकन देखील मिळू शकते. पण, पुन्हा एकदा अव्वल खेळ साकारला तर आम्ही सुवर्ण आमच्याकडेच कायम राखू शकतो’, असे चिरागने पुढे नमूद केले.
गोल्ड कोस्टमध्ये चिरागने पुरुष दुहेरीतील सहकारी सात्विकराज रणकिरेड्डीने रौप्य मिळवले होते. आता त्यापेक्षा सरस कामगिरी साकारत सुवर्ण जिंकण्याचे आपले ध्येय असल्याचे चिराग याप्रसंगी म्हणाला. ‘मागील वेळी आम्ही नवखे होतो. पण, आता परिस्थितीत अनुकूल बदल झाला आहे. आम्ही आता टॉप टेनमध्ये आहोत आणि अव्वल दर्जाच्या खेळाडूंना कसे सामोरे जायचे, याचा उत्तम अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे, सुवर्ण जिंकणे हे आमचे पहिले लक्ष्य असेल’, असे त्याने सांगितले.
यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी जूनमध्ये आयोजित इंडोनेशिया ओपन सुपर 1000 व मलेशिया ओपन 750 स्पर्धेवरही वरचष्मा गाजवण्याचे भारताचे लक्ष्य असेल.