प्रतिनिधी/ चिपळूण
खेर्डी औद्योगिक वसाहतीतील थ्री एम पेपर मिलमध्ये उत्तरप्रदेशमधून एकाच बसमधून 47 कामगार आणल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव, शेखर निकमांसह राजन साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर मंगळवारी प्रशासनाने कंपनी व्यवस्थापकासह बसचालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्तांनीही सायंकाळी कारवाईची नोटीस बजावली आहे.
जिल्हय़ात कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी असतानाही उत्तरप्रदेशमधून सोमवारी 47 कामगारांना घेऊन बस खेर्डीत दाखल झाल्याने संतापाची लाट पसरली. लॉकडाऊनचे नियमांचे सर्वसामान्यांकडूक काटेकोर पालन होत असताना आणि सोशल डिस्टन्सींग व अन्य नियमांचा फज्जा उडवत आलेल्या या कामगारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यातून स्थानिकांनी कामगारांची अन्यत्र व्यवस्था करत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. मात्र खेर्डीतील एका घरात क्वारंटाईन केलेल्या या कामगारांना अन्यत्र हलवण्यास कंपनी व्यवस्थापन तसेच प्रशासन चालढकल करत असल्याने असंतोष वाढू लागला.
दरम्यान, मंगळवारी दुपारी आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱयांना पत्र देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी यांनीही याप्रकरणी आक्रमक होत प्रशासनाला सवाल केले. जिल्हा बंदी असताना कामगार आले कसे, एसटीमध्ये 21 प्रवाशांना परवानगी असताना या कामगारांनी कोणते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले, कामगार येताना त्यांनी पास घेतला होता का, कामगारांनी स्थानिक प्रशासनाकडे याची नोंद केली होती का? विलगीकरणासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आली, असे प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर लोटे, खेर्डी, गाणे खडपोली एमआयडीसीतील सर्वच कारखान्यांत शासनाच्या नियमाप्रमाणे 80 टक्के स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी महत्वपूर्ण भूमिका यानिमित्ताने आमदार निकम यांनी मांडली.
स्थानिकांची अधिकाऱयांशी चर्चा
सोमवारी कामगार खेर्डीत आणल्यापासून स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्यासह कार्यकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापक हसमुख मुराजी संगोई, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या भेटी घेत आक्रमकपणे नागरिकांची भूमिका मांडली.
सहाय्यक कामगार आयुक्तांकडून चौकशी
याप्रकरणी रत्नागिरीतील सहाय्यक कामगार आयुक्त जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला यासंदर्भात सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर आपण कंपनीला नोटीस बजावली आहे. कामगारांचे विलगीकरण करताना त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना अथवा अन्य कामगारांना होता कामा नये. येताना या कामगारांची नोंदणी आपल्याकडे करण्यात आलेली नसल्याने याबाबत आमच्या पातळीवरील सर्व मुद्यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.
कंपनी व्यवस्थापकासह बसचालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल
उत्तरप्रदेशमधून कामगार आणताना सामाजिक अंतर न पाळता 47 कामगारांना आणल्याप्रकरणी शिरगांव पोलिसानी कंपनी व्यवस्थापक हसमुख मुराजी संगोई, बसचा चालक राजू गुप्ता, ठेकेदार रवीसिंग कुत्तूलाल अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली. याप्रकरणी तलाठी नंद गवळी यांनी फिर्याद दिली आहे.