ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, विनामास्क फिरणा-यांकडून 500 रुपये दंड घेताना त्यांना 10 मास्क द्यावे. यामुळे ते मास्कचा वापर करण्याकरीता उद्युक्त होतील, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, मास्क घालणे आवश्यक असले, तरी दंडाची रक्कम मोठी आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असले, तरी ही दंडात्मक कारवाई करुन याकडे उत्पनाचे साधन म्हणून पाहणे चुकीचे आहे. त्याकरीता त्या रकमेच्या बदल्यात नागरिकांना मास्क दिल्यास ते स्वत: व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मास्क घालण्यास उद्युक्त होतील. त्यामुळे त्या दंडाच्या रकमेमध्ये मास्क किंवा आरोग्यदृष्टया आवश्यक वस्तू नागरिकांना दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.