कोणतेही अचंबित करणारे कार्य कोणी त्याच्या नावावर खपवावे…. त्याने पाय गोल फिरवला म्हणून समुद्रात वादळ उठले म्हणावे आणि हिमालयात गेला म्हणून बर्फ वितळला म्हणावे… त्याच्या नावावर काहीही खपतेच. बंगलोरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर डाव्या हाताच्या बोटात नोटांची वर्गवारी करत चटपटीत संवाद फेकत शेतकरी, श्रमिक, महिलांना तणावमुक्त करत तो त्यांचा प्रवास सुखाचा करायचा. लोकांना तणावमुक्त करण्याचे हे तत्त्व त्याने आपल्या चित्रपटातून आयुष्यभर जपले. शिवाजीराव रामोजीराव गायकवाडने म्हणूनच गरीब तामिळी जनतेसह भारतीयांच्या मनावर पाच दशके राज्य केले. त्याला मानाचा ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ केंद्र सरकारने जाहीर केला आहे. रजनीकांत…. थलैवा…. द बॉस…. बिल्ला, दळपती, बाशा, मुत्थू, त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक नावांनी जाणले. त्याला देवाच्या जागी बसवले, त्याच्या सिनेमाचा पहिला खेळ पाहण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्याच्या चित्रपटाचे पोस्टर फुटात नव्हे तर मीटरमध्ये मोजतात. एकाच वेळी अनेक देशांमध्ये चित्रपट झळकण्याचे चमत्कार घडतात. त्याच्या पूर्वजांचे मूळ गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्मयातील मावडी कडेपठार. जेजुरीचा खंडेराया हे गायकवाड घराण्याचे कुलदैवत. ही इथल्या प्रत्येक मराठी माणसासाठीही अभिमानाची बाब. साधी जीवनशैली, नम्र स्वभाव, व्यावसायिक धोका पत्करण्याची क्षमता आणि भूमिका इतक्मया आत्मविश्वासाने वठवावी की पाहणाऱयाला काल्पनिक पात्रही खरे भासावे! त्यामुळेच कल्पनेच्या पल्याडच्या अचाट गोष्टी करणारा रजनीकांत सुपरहिरो बनला नसता तरच ते आश्चर्य ठरले असते. ‘स्टारडम’चा माज नाही, इतरांना कमी लेखले नाही, कोणत्या वादात सापडायचे नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात दिखाव्यावर भर द्यायचा नाही ही त्याची वैशिष्टय़े. सत्तरीच्या पार गेलेला, काळय़ाकुट्ट चेहऱयाचा, डोक्मयाच्या निम्म्या भागावर टक्कल असलेला हा दानशूर व्यक्ती आपले रियल लाईफ रियलच ठेवतो. कॅमेरा समोरचा माणूस वेगळा असला तरी लोकांच्या डोळय़ासमोर असणारा माणूस हा खराखुरा असला पाहिजे यासाठी आग्रही असणारा असा हा असामान्य अभिनेता. पण त्याचे रिळ लाईफ पूर्णतः वेगळे… तिथे तो असतो नायक…. अचंबित करणारा, हशा, टाळय़ा आणि शिट्टय़ांची आणि तेवढय़ाच रसिकांच्या प्रेमाची वसुली करणारा! चित्रपटातील त्याच्या प्रवेशाला नोटांची आणि चिल्लरची उधळण, फटाक्मयांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई झळाळून उठते. 2007 सालच्या ‘शिवाजी-द बॉस’ चित्रपटाने त्याच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले. आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणाऱया जॅकी चॅन बरोबरचा तो एकमेव कलाकार ठरला. या चित्रपटासाठी त्याने तब्बल 26 कोटी रु. मानधन घेतले. जगातील सर्वाधिक चाहतावर्ग असणारा अभिनेता असा लौकिक मिळवला. ‘टाईम’ मासिकाच्या यादीत जगातील सर्वाधिक प्रभावी 100 व्यक्तींमध्ये त्याची गणना झाली. 1975 सालापासून कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्रजी, बंगाली चित्रपटांमधून अभिनय करत तो यशाची शिखरे पादाक्रांत करत राहिला. वैशिष्टय़ म्हणजे मातृभाषा मराठी असून पण मराठीतील कोणीही त्याला अभिनयासाठी अद्याप निमंत्रित केलेले नाही. तो आता पूर्णतः तमिळ भूमीचा झाला आहे. रजनी मक्कल मड्रम या त्याच्या चाहत्यांच्या संघटनेच्या तामिळनाडूत 65,000 शाखा आहेत. त्या शाखांमध्ये जवळपास सव्वा कोटी इतके सभासद आहेत. या लोकप्रियतेचा फायदा आपल्याला मिळावा यासाठी विविध राजकीय पक्ष त्याला आपल्या जवळ बाळगण्याचा प्रयत्न करतात. पण प्रादेशिक पक्ष आणि विचारधारेचे अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गरज असताना तामिळी जनतेच्या अपेक्षांचे ओझे मात्र हा सुपरहिरो…थलैवा कमी पडला आहे. जयललिता आणि करुणानिधी हे द्रविडी अस्मितेचे दोन चेहरे लुप्त झाले असताना तो अजूनही चाचपडत आहे. स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा. कालांतराने प्रकृतीचे कारण देत त्या निर्णयापासून परावृत्त होणे. असे अनेक किस्से त्याच्याबाबत घडत असतात. आयुष्यात कधीकाळी या चित्रपटसृष्टीचा त्याला उबग आला होता आणि सर्व सोडून संन्यास पत्करून तो बाजूलाही झाला होता. मात्र हे संन्यस्त व्रत त्याला फार काळ पेलता आले नाही. तो पुन्हा वळला आणि दंतकथांचा महानायक झाला. आज वयाची बहात्तरी ओलांडल्यानंतर टक्कल पडलेला एक वृद्ध लुंगीधारी म्हणून सामोरा जातो. मात्र तरीही लोकांना त्याच्या या वास्तव रूपापेक्षा त्याच्या प्रतीरूपाची भुरळ प्रचंड आहे. त्यामुळे तो जे रूप घेईल त्या रूपात लोक त्याला स्वीकारतात आणि लोकांना जसा तो पाहिजे आहे अशा रूपात तो आपल्या चित्रपटातून त्यांना दर्शन देतो. त्यांना हवे तसे स्टंट करतो. प्रत्यक्ष जीवनातील त्यांच्या दुःखांवर त्याची कला अशाप्रकारे एक तर फुंकर घालते किंवा त्यांच्या मनातील उदेकाला वाट वेगळी करून देते. हे योग्य की अयोग्य असे जर कला क्षेत्रातील कोणालाही विचारले तर ते अयोग्यच म्हणणार. पण जगातील सर्व दुःखांनी ज्यांचे आयुष्य व्यापले आहे, त्यांना तो जे काही करतो ते योग्य वाटते. त्यांना ते करता येत नाही म्हणून त्याची अपेक्षा ते रजनीकांतकडून करतात. चित्रपटातील त्याचे स्टंट कमी होते म्हणून आता त्याच्या नावावर काहीही खपवले जाते आणि विनोद म्हणूनसुद्धा ते स्वीकारले जाते. याला यशाच्या कोणत्या मापदंडाने मापावे? वास्तववादाचा आवाज रजनीकांत नावाच्या वादळात कुठेच ऐकू येणार नसतो. पण म्हणून अस्सल कलेची महती कलाकार जाणत नाही असे नसते. फक्त रजनीकांतला त्या दंतकथेच्या प्रभावळीतून बाहेर पडणे कधीही शक्मय नसते. तशी कोणाचीही अपेक्षा नसते. अशा शिखरांना परतीची पायवाटही नसते! त्या शिखरावर रजनीकांतच्या गळय़ात दादासाहेब फाळके पुरस्काराची माळ पडली आहे. ती माळ राजकीय फायदा व्हावा म्हणून घातली असाही आरोप होत आहे. पण वादळाला गौरवायचे तर थोडे तरी त्याच्या कक्षेत घोंगावत्या वादांना सामोरे जावेच लागणार. तीही दंतकथाच बनून राहणार!
Previous Articleनवीन आर्थिक वर्षात सेन्सेक्सची दमदार सुरूवात
Next Article महाविकास आघाडीचा व्यवस्थापनाला टोला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.