काही ठिकाणी पाण्याला काचेसारखी लकाकीA
मालवण:
उष्णतेमुळे सध्या अंगाची काहिली होत असताना वाऱयानीही आपली दिशा बदलल्याने उष्णतेची तिव्रता आणखीनच वाढली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरेकडून वारा वाहत होता. परंतु सध्या दिवसा दक्षिणेकडून वारे वाहत आहेत. या वाऱयांमुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, मासेमारीवर या वाऱयांचा विशेष प्रभाव पडलेला नाही.
दक्षिणेकडून वारा वाहणे हे सर्वसाधारणपणे वादळसदृशस्थितीचे संकेत मानले जातात. परंतु सद्यस्थितीत तशी शक्यता दिसत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. दिवसा हे वारे वाहत असले तरी ते खूप जोराने वाहत नाही आहेत. सायंकाळनंतर हे वारे थोडे धिमे होत आहेत. त्यांच्या दिशेतही थोडा बदल होताना दिसतो. दक्षिण व उत्तर दिशेच्या मधोमध या वाऱयांची दिशा असते. मात्र, दिवसा दक्षिणेकडून वाहणाऱया वाऱयांमुळे उष्णतेच्या झळा आणखीन वाढत आहेत. दरम्यान, दक्षिणेकडील वाऱयांमुळे दहा वावामधील (साधारणपणे 60 फूट खोल) काही खडकांच्या आजूबाजूच्या समुद्रातील तळ दिसून येत आहेत इतके पाणी स्वच्छ व पारदर्शी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पर्यटनासाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. अंदमान निकोबारप्रमाणे पाण्यला काचेसारखी लकाकी दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 25 ते 27 मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहणार आहे. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माशांची आवक घटली
दक्षिणेकडील वाऱयांचा मासेमारीवर विशेष प्रभाव पडला नसला तरी मासेमारीस गेलेल्या नौकांना फार मोठय़ा प्रमाणात मासे मिळत असल्याचे चित्र नाहीय. मालवणात शनिवारचा दिवस पुन्हा एकदा सुरमईविना गेला. तसेच बांगडा व इतर माशांची आवक घटल्याने भावही वधारले होते.