खरं तर हा कलाकार महाराष्ट्राच्या मातीतला. कामानिमित्त कुटुंब दक्षिणेत गेलं आणि हा अवलिया तिकडचाच झाला. आता तर तो त्यांचाच आहे अस म्हणणं चुकीचं ठरणार आहे. तो आता सर्वांचा आहे हे म्हणणंच योग्य ठरणार आहे. रजनीकांत यांनी आतापर्यंत एकूण 190 चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालचंद्र हे रजनीकांत यांचे गुरु. त्यांनीच खऱया अर्थाने रजनीकांत हा सुपरस्टार घडविला आहे. रजनीकांत यांच्यामध्ये अशी जादू आहे, जी त्यांना इतर अभिनेत्यांपासून वेगळे ठरविते. 45 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ब्लॅक अँड व्हाइट, रंगीत, 3डी आणि ऍनिमिटेड या सर्वच्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. वय हा केवळ आकडा असून जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर कलाकार किती उंच झेप घेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रजनीकांत!
टोपी मुनिअप्पा या कन्नड सिने-नाटय़ दिग्दर्शकाचं नाव आज फारसं कुणाला माहिती नसेल. पण या मुनिअप्पांनी बेंगळूरच्या सिटीबस प्रवासात शोधलेले रत्न मागील 40 वर्षे सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. नुसतं लोकप्रिय नव्हे तर राजमान्यता मिळालेले हे रत्न म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टाइलबाज अभिनेता रजनीकांत अर्थान शिवाजीराव गायकवाड. भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि पुणे जिल्हय़ातल्या पुरंदर तालुक्यात मावडी-कडेपठार हे मूळ गाव असलेल्या मराठमोळय़ा अभिनेत्याच्या कर्तृत्वाने देशपातळीवर उजळून निघाले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार रजनीकांत यांनी स्वतःच्या अभिनयाने देशविदेशात प्रचंड नाव कमावले आहे. त्यांच्या हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमधील अनेक चित्रपटांना ऐतिहासिक मानले जाते. अशा थोर कलावंताला चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळूरमधील कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात झाला होता. त्यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून वडिलांनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले होते. रजनीकांत आज ज्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत, तेथेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. सिनेमाचा हा सुपस्टार कधीकाळी हमाल आणि बस कंडक्टर म्हणून काम करायचा. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांनी अनेक प्रकारची कामे केली आहेत.
बस कंडक्टर झाल्यावरही रजनीकांत यांचा प्रारंभापासूनच अभिनयाकडे ओढा होता. याचमुळे कंडक्टरच्या नोकरीनंतर त्यांनी 1973 मध्ये मद्रास फिल्म संस्थेत प्रवेश घेत अभिनयाचे धडे घेतले होते. त्यानंतर या दिग्गज अभिनेत्याने अभिनयाची सुरुवात नाटय़क्षेत्रातून केली. दुर्योधनाच्या भूमिकेतून ते घरोघरी पोहोचले होते. रजनीकांत यांचे अभिनय कौशल्य पाहून दिग्गज निर्माते-दिग्दर्शक के. बालचंद्र यांनी त्यांना पहिली संधी दिली. त्यांनी रजनीकांत यांना तमिळ चित्रपट अपूर्वा रावंगलमध्ये एक व्यक्तिरेखा साकारू दिली. या चित्रपटात कमल हासन आणि श्रीविद्या देखील होते.
या चित्रपटातील रजनीकांत यांच्या अभिनयाने वाहव्वा मिळविली होती. त्यानंतर रजनीकांत यांनी स्वतःच्या प्रारंभिक चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली. क्अनेक नकारात्मक भूमिका साकारल्यावर एस.पी. मुथुरमन यांच्या ‘ओरु केल्विकुरी’ या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दलचे प्रेम वाढतचं गेल. प्रेक्षक त्यांची देव म्हणून पूजा करू लागले. त्यांचे चित्रपट पहाटे साडेतीन वाजल्यापासून प्रदर्शित केले जायचे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह रजनीकांत यांनी स्वतःच्या अभिनयाचा प्रभाव बॉलिवूडमध्येही पाडला आहे.
80 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठले. रजनीकांत यांनी 1983 मध्ये ‘अंधा कानून’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर रजनीकात यांनी ‘जीत हमारी’, ‘मेरी अदालत’, ‘वफादार’, ‘गिरफ्तार’, ‘असली नकली’, ‘हम’ आणि ‘बुलंदी’सह अनेक बॉलिवूडपटांमध्ये काम केले होते. सद्यकाळात रजनीकांत हे आशियातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत.
बॉलिवूडचेही सुपरस्टार
रजनीकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत थलाइवा या नावाने ओळखले जाते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांचा बोलबाला तर आहे, याचबरोबर बॉलिवूडमध्येही ते सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांचे देशभरात कोटय़वधी चाहते आहेत. 1983 मध्ये त्यांनी अंधा कानून चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील कारकीर्दीस प्रारंभ केला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत हेमामालिनी आणि अमिताभ बच्चन होते. त्याकाळात रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले होते आणि बॉलिवूडमध्ये त्यांचा अंधा कानून हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱया चित्रपटांपैकी एक ठरला होता.
दिग्गज कलाकारांसोबत काम
त्यानंतर त्यांनी जीत हमारी, मेरी अदालत, गंगवा, जॉन जॉनी जनार्धन आणि वफादार यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 1985 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत गिरफ्तार हा हिट चित्रपट दिला. या चित्रपटात त्यांच्यासोबत कमल हासन देखील होते. रजनीकांत यांनी धर्मेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, माधुरी दीक्षित, जितेंद्र, कादर खान आणि राज कुमार या दिग्गजांसोबत काम केले आहे.
पूर्वाश्रमीचे कंडक्टर
चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळूर मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. चित्रपट कारकीर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या राम-हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करायचे. सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख होणारे रजनीकांत हे एकमेव अभिनेते आहे. अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत यांना मोठा स्ट्रगल करावा लागला आहे. बंगळूर आणि चेन्नई (तत्कालीन मद्रास) शहरात त्यांनी अनेक प्रकारची कामे केली असून ज्यात त्यांनी हमाल म्हणून सुतार म्हणून कामही केले होते. याचदरम्यान ‘बेंगळूर परिवहन सेवेत’ भरती प्रक्रिया सुरू झाली असताना रजनीकांत यांची निवड झाली, पण यातून त्यांची आर्थिक समस्या काही प्रमाणात दूर झाली होती. या नोकरीदरम्यान रजनीकांत स्टेश शोमध्ये भाग घ्यायचे. एक कंडक्टर म्हणूनही त्यांची कार्यपद्धत एखाद्या स्टारपेक्षा कमी नव्हती. ते स्वतःच्या वेगळय़ा प्रकारे तिकीट देणे आणि शिटी मारण्याच्या शैलीवरून प्रवासी आणि अन्य बसकंडक्टरांदरम्यान विख्यात होते. बस कंडक्टरमधील हीच कला एका दिग्दर्शकाने हेरल्यानेच इतिहास निर्माण झाला आहे.
हिमालय ‘बेक’
प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी बेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 1978 मध्ये प्रदर्शित ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर पोहोचविले. या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाल्याने दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत याहंचे 35 फुटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते. रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होताना अन्य कोणताही निर्माता स्वतःचा चित्रपट प्रदर्शित करत नव्हते. रजनीकांत यांच्या चित्रपटाची गर्दी ओसरू लागल्यावरच अन्य चित्रपट प्रदर्शित केले जायचे.
अनोखी स्टाइल
स्टाइलच्या बाबतीत रजनीकांत अग्रेसर आहेत. रजनीकांत नेहमीच स्टायलिश हीरो राहिले आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांची स्टाइलच अधिक पसंत असते. भले मग तो गॉगल घालण्याची पद्धत असतो, सिगारेट शिलकावणे, खांद्यावर स्टोल फ्लिफ करणे किंवा आत्मविश्वासपूर्ण रजनीकात यांचे चालणे या सर्व गोष्टी त्यांना इतरांपासून वेगळी ओळख प्रदान करतात. ते कोणत्याही प्रकारची भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारतात. विनोदी, मोहक, हिंसक यासारख्या भूमिका वठविण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही.
रजनीकांत यांनी ‘स्लो मोशन’चा ट्रेंड सेट केला होता. हिरोची चाल वेगळी असावी हे त्यांनी चित्रपटसृष्टीला दाखवून दिले. रजनीकांत यांच्या प्रत्येक भूमिकेत स्टाइल आणि उत्साह दिसून येतो. ते कधीच कमकुवत व्यक्तिरेखा साकारत नाहीत. चित्रपटांमध्ये संवादफेकीची त्यांची स्वतःची वेगळी पद्धत आहे, देशविदेशातील लोक त्यांचा आवाज आणि स्टाइलचे प्रेमी आहेत.
रजनीकांत स्वतःच्या सिगारेटला स्वतःच्या सिग्नेचर वॉकसह फ्लिप करतात. रजनीकांत यांना फ्लिपिंगची संकल्पा अधिक पसंत आहे. त्यांच्या चित्रपटांमध्येच कधीच हेअरस्टाइल बदललेली दिसून आलेली नाही. वैयक्तिक जीवनात मात्र रजनीकांत अत्यंत साध्या राहणीमानाला प्राधान्य देतात. स्वतःची पांढरी झालेली दाढी त्यांनी कधीच लपविण्याचा प्रयत्न केला नाही.
रजनीकांत यांनी लता रंगचारी यांच्याशी विवाह केला. लता या कॉलेज नियतकालिकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला आल्या होत्या. पाहताक्षणीच प्रेमात पडलेल्या रजनीकांत यांनी लता यांना मागणी घातली होती. 26 फेब्रुवारी 1981 रोजी आंध्रप्रदेशच्या तिरुपतिमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. रजनीकांत यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. ऐश्वर्याने 2004 साली दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत विवाह केला असून त्यांना दोन मुलगे आहेत. तर छोटी मुलगी सौंदर्या तमिळ चित्रपटसृष्टीत सक्रीय असून दिग्दर्शक, निर्माता आणि ग्राफिक्स डिझायनर देखील आहे. तिने 2010 मध्ये उद्योजक अश्विन रामकुमार याच्याशी विवाह केला होता.
कारकीर्दीचा गौरव
रजनीकांत यांना 2000 साली भारत सरकारने कलाक्षेत्रातील योगदानाकरता पद्मभूषणने सन्मानित केले होते. नल्लावानुकू नल्लावन या तमिळ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. रजनीकांत यांना तामिळनाडू सरकारकडून 1984 मध्ये कलाइममनी पुरस्कार मिळाला तर 1989 मध्ये एमजीआर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. एशियावीक या नियतकालिकाने रजनीकांत यांना दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरविले होते. रजनीकांत यांना जर्मनीतील सर्वोच्च नगारी परुस्कार द फ्युरिअरने सन्मानित करण्यात आले आहे. जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्यांना जागतिक चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी देण्यात आला होता. टाईम नियतकालिकाने रजनीकांत यांना जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. रजनीकांत हे आशिया खंडातील चित्रपट जगतात जॅकी चॅननंतरचे सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धीसाठी त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. 1995 मध्ये आध्यात्मिकतेसाठी ‘ओशोबिस्मित’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.