भाजपशी आघाडीमुळे अल्पसंख्याक अण्णादमुकपासून दुरावला, शशिकला यांच्या मंदिरभेटीमुळे रालोआला चिंता
दक्षिण तामिळनाडूत नेहमीच प्रभावशाली मानल्या जाणाऱया ‘थेवर’ जातीचे वर्चस्व राहिले आहे. गाउंदर, वन्नियार आणि देवेंद्र कुला वेल्लालारचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. थेवर पारंपरिक स्वरुपात अण्णाद्रमुकचे पाठिराखे राहिले, पण या जातीच्या शशिकला पक्षातून बाहेर पडल्याने आणि पुतण्या टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून स्वतःचा पक्ष स्थापण्यात आल्याने मतपेढीत फूट पडल्याचे मानले जातेय. याचबरोबर वन्नियारांना 10.5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही अण्णाद्रमुकसाठी बुमरँग ठरला असावा. दक्षिण तामिळनाडूत अण्णाद्रमुकला 2016 च्या निवडणुकीत 58 पैकी 32 जागांवर विजय मिळाला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. यंदाच्या निवडणुकीत पक्षाला 20 जागांवर यश मिळणेही अवघड असल्याचे मानले जात आहे.
दक्षिण तामिळनाडूत मदुराई, तेनी, शिवकाशी, तूतिकोरिन, विरुधुनगर, तिरुनेलवेली यासारखे जिल्हे मोडतात. ई. पलानिसामी सरकारने वन्नियारला आरक्षण देत स्वतःचा मतदारसंघ वाचविला आणि पश्चिम तामिळनाडूत स्वतःला मजबूत केले, पण दक्षिण तामिळनाडू समवेत दुसऱया हिस्स्यांमध्ये अन्य अतिमागास जातींची (एमबीसी) भूमिका अण्णाद्रमुकच्या विरोधात दिसून आली आहे.
देवेंद्र कुला वेल्लालारसंबंधी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देखील थेवर समुदाय नाराज आहे. सुमारे 60 लाख लोकसंख्या असलेल्या या जातीचा एक मोठा वर्ग सत्ताधाऱयांच्या विरोधात गेल्याचे मानण्यात येते. तर पूर्ण श्रेय केंद्र सरकारने घेतल्याने देवेंद्र कुलाचे दिग्गज नेते कृष्णास्वामी स्वतःला अप्रासंगिक मानू लागले आहेत. त्यांचा पक्ष रालोआतून बाहेर पडत 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. अण्णाद्रमुकला मदुराई क्षेत्रात स्टॅलिन यांचे ज्येष्ठ बंधू अलागिरी यांच्या बंडखोरीच्या भूमिकेपासून अपेक्षा होती. पण निवडणुकीच्या काळातील त्यांचे मौन द्रमुकसाठी सहाय्यभूत ठरले आहे.
शशिकला थेवर समुदायाशी संबंधित
थेवर समुदायाच्या असणाऱया शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी, त्यानंतर त्यांच्या राजकीय संन्यासामुळे देखील थेवर समुदाय अण्णाद्रमुक आघाडीपासून दूर गेला आहे. मागील 10 दिवसांमध्ये शशिकला यांना दक्षिण तामिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये पाहिले गेले आहे. यादरम्यान एएमएमकेकडून झालेल्या स्वागतामुळे अण्णाद्रमुकच्या चिंतेत भर पडली आहे. अण्णाद्रमुकमधून बाहेर पडलेले एएमएमके प्रमुख दिनाकरन चेन्नई सोडून दक्षिणेतील कोविलपट्टू मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दक्षिणेतून जिंकण्याचा लाभ
एमजीआर आणि जयललिता दक्षिण तामिळनाडूतून प्रत्येकी तीनवेळा विजयी झाले होते. यंदाही या क्षेत्रातून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. यात उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम, मंत्री डिंडीगुल श्रीनिवासन, उदय कुमार, सुंदरम, दिनाकरन आणि कन्याकुमारीतून भाजपचे राधाकृष्णन यासारखी नावे सामील आहेत.