प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, फळ बागायत शेतकरी, कामगार या सर्वांना एकत्रित करून दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करा, या चळवळीचे नेतृत्व तुम्ही करावे, अशी विनंती राष्ट्र सेवा दलचे अध्यक्ष भाषातज्ञ पद्मश्री गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना केली. केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी गुरुवारी ते कोल्हापूर दौऱयारव आले होते.
महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी दक्षिण भारतातील शेतकरी व डाव्या विचारसरणीच्या लोकांची भेटी घेत आहेत. आज कोल्हापूर जिह्याच्या दौ-यावर असताना त्यांनी राजू शेटटी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्रित पणे लढा उभा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील 260 शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणाऱया अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सहकार्याने हा लढा देशभर उभा करण्याची भुमिका मांडली. यावेळी गणेश देवी यांनी राष्ट्र सेवा दलाच्यावतीने लवकरच सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे सांगितले.