प्रतिनिधी/ बेळगाव
मेकॉलेच्या झिरपत्या शिक्षण सिद्धांतास विरोध करून शिक्षणाचा प्रवाह तळातून वर गेला पाहिजे, असा आग्रह महात्मा फुले यांनी शिक्षण आयोगासमोर ठेवला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मानवता, सामाजिक न्याय व स्वावलंबी शिक्षण हाच शैक्षणिक धोरणाचा आधारभूत सिद्धांत आहे, असे महात्मा फुले मानत. त्याचे महत्त्व आज आपल्याला पटते आहे, असे उद्गार प्रा. विक्रम पाटील यांनी काढले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित ज्योतीराव फुले पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सुरेश पाटील यांनी तर संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ऍड. राजाभाऊ पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करून आभार मानले. यावेळी मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.