प्रतिनिधी/ मडगाव
काल शनिवारी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण आणि उत्तर गोव्यात काँग्रेस पक्ष विजयी होतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केला आहे. भाजप सरकारने मतदारांना परावृत्त करण्यासाठा बरेच डावपेच आखले, परंतु त्याला न जुमानता मतदारांनी मतदान केले व ते भाजप विरोधी असल्याची प्रतिक्रिया श्री. कामत यांनी व्यक्त केली आहे.
काल सकाळी सुरुवातीच्या काळात अगदी कमी मतदान करणे हे सरकार कठीण काळात आणि संकटात सापडलेल्या राज्यातील सर्व सामान्य जनतेला मदत करण्यास अपयशी ठरल्याबद्दल लोकांच्या असंतोषाचे स्पष्ट संकेत होते. जनतेच्या भावना सरकारच्या विरोधात आहेत हे त्यांना ठाऊक असल्याने भाजपने लोकांना मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. विकास आणि प्रगतीचे दावे करणाऱया भाजपला मतदारांनी सपाट केल्याचे चित्र काल सर्वत्र आढळून आले.
प्रचारासाठी भाजपने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. आचारसंहिता लागू असतानाही मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी खुलेआम सभा घेतल्या. याच्या उलट घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि अंतर्गत सभा घेण्यासही विरोधकांना परवानगी नव्हती.
लोक दुपारनंतर बाहेर आले आणि भाजप व त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात संताप असल्याचे दिसून आले. लोकांनी काँग्रेसच्या उमेदवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि भाजपा आणि त्याच्या मित्रपक्ष पुरस्कृत असलेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
आपण दक्षिणेतील काही मतदारसंघांना भेट दिली, तर गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा दौरा केला. जनतेची नाडी ही काँग्रेस समर्थक असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.