जम्मू-काश्मीर प्रशासन – पासपोर्ट तसेच सरकारी नोकरीपासून रोखणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याच्या निर्णयाला लवकरच दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. केंद्रशासित प्रदेशातील विशेष दर्जा समाप्त झाल्यापासून तेथे तुलनेत शांतता नांदत आहे. अनेकदा समाजकंटकांनी हिंसा भडकविण्याचा प्रयत्न केला पण कठोर सुरक्षेमुळे त्यांना अपयश आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता अशा समाजकंटकांच्या विरोधात कठोर भूमिका अवलंबिण्यात येणार आहे. अशा समाजकंटकांना आता सरकारी नोकरी मिळणार नाही तसेच पासपोर्टही प्रदान करण्यात येणार नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱयांवर देशद्रोही घोषित केले जाईल. अशा समाजकंटकांना जम्मू-काश्मीर सरकार कुठल्याच शासकीय नोकरीत संधी देणार नाही. याचबरोबर अशा लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज केल्यास तो फेटाळण्यात येणार आहे.
विदेशी जाण्याची संधी नाही
दगडफेक करणारे आणि केंद्रशासित प्रदेश तसेच देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱया कारवायांमध्ये सामील लोकांना पासपोर्टपासून वंचित ठेवले जाणार आहे. यामुळे अशा लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळणार नाही. सीआयडीच्या विशेष शाखेकडून संबंधित अधिकारी आणि विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आला आहे.