ऑनलाईन टीम / पुणे :
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य ज्ञान प्रदान केले होते. हे ज्ञान केवळ कोणा एकासाठी नाही, तर विश्वातील मानवजातीसाठी आहे. तब्बल 700 श्लोक आणि 18 अध्यायांची आहे. त्यामुळे गीताजयंतीच्यानिमित्ताने गणरायासमोर या गीतेचा प्रतींचा ज्ञानभोग लावण्यात आला. गणरायांसोबत या पवित्र ग्रंथाचे देखील भक्तांना दर्शन घेता यावे, याकरीता हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि इस्कॉन पुणे यांच्यातर्फे गीताजयंतीच्यानिमित्ताने गणरायासमोर भगवद््गीतेच्या प्रतींचा ज्ञानभोग लावण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, इस्कॉन पुणेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गीतेतील 5 अध्यायांचे पठण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे यंदा 5 वे वर्ष आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी जगाच्या आणि मानवजातीच्या कल्याणासाठी जो सर्वोच्च मूल्यांचा ठेवा गीतेच्या माध्यमातून विशद केला. त्या ज्ञानाचा प्रचार, प्रसार व्हावा, याकरीता गणरायांच्याचरणी ज्ञानाचा भोग लावला आहे. आजच्या चिंतेच्या व धावपळीच्या जगात आपण कसे जगावे, याचे मार्गदर्शन गीतेमध्ये केले आहे. याद्वारे आपण आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट गाठू शकतो. त्यामुळे या गीतेच्या प्रती भक्तांना देखील देण्यात येणार आहेत.