तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूचा प्रसार बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये पसरत असल्यामुळे बार्शी शहर आणि तालुक्यात चिंतेचे ढग हमेशा दिसत होते. मात्र आज सकाळपासून मान्सूनच्या ढगाने बार्शीच्या आकाशामध्ये हजेरी लावल्याने निदान पावसाने तरी काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता होती. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र दुपारी तीनच्या सुमारास मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने कोरोनाची चिंता जरी असली तरी या मान्सूनच्या पावसाने थोडासा दिलासा दायक चित्र बळीराजाच्या आणि एकंदरीत बार्शीकर यांच्यात पाहायला मिळाले.
बार्शी तालुक्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ६५ टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली होती मात्र चार दिवस पावसाने दडी मारल्याने झाली पेरणी उगवते की नाही ही चिंता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत होती. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊन आणि संचार बंदीमुळे शेतकरी राजाचे आर्थिक कंबरडे मोडले होते. त्यात आता पेरणी पूर्ण झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने भयंकर आर्थिक संकट बळीराजाच्या डोक्यावर येणार होते. मात्र आज मान्सूनच्या पावसाने दुपारी तीन ते चार एक तास केलेली धुवाधार बॅटिंगने या चिंतेचे काही प्रमाणात का होईना बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांचे महाबीज किंवा इतर कंपन्यांकडून घेतलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नव्हते, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुबार पेरणी सुद्धा केली होती मात्र पाऊस नसल्याने बियाणे उगवते की नाही ही चिंता होती. आज झालेल्या मान्सूनच्या जोरदार पावसाने मातीतील ओलावा कायम टिकणार असून या ओलाव्याने बियाणाला अंकुर फुटून बळीराजाचे शिवार हिरवीगार होणार आहेत यात शंका नाही. आजच्या दुपारच्या या झालेल्या पावसाचे अधिकृत आकडेवारी बातमी पाठवेपर्यंत उपलब्ध झालेली नव्हती किंवा या पावसाने झालेले नुकसान याची माहिती बातमी पाठवे पर्यंत प्राप्त झालेली नव्हती.