मनीषा सुभेदार / बेळगाव
नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रिया जागृती महिना आहे, त्यानिमित्त…
रस्त्याच्या कडेला अर्भक सापडले… आश्रमाच्या कट्टय़ावर अर्भक आढळले… बाळाला सोडून मातेचे हॉस्पिटलमधून पलायन… अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. या अर्भकांचे पुढे काय होते, ती कुठे जातात, कोण त्यांचे संगोपन करते, असे प्रश्नही आपल्याला पडतात. या प्रश्नांचे उत्तर आहे बेळगाव शहरात कार्यरत असणारे ‘स्वामी विवेकानंद सेवा प्रति÷ान’. सदर प्रति÷ानला जिल्हय़ामधील अधिकृत दत्तक विधान केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून आजपर्यंत या प्रति÷ानद्वारे 106 मुलांना दत्तक दिले गेले आहे.
नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना म्हणून आचरणात आणला जातो. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानच्या कार्यकारी संचालिका डॉ. मनीषा भांडणकर यांची मुलाखत घेतली आणि एकूण दत्तक प्रक्रिया, कायदा आदी पैलू जाणून घेतले.
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान कधी अस्तित्वात आले?
प्रति÷ानची स्थापना 1982 मध्ये झाली. तेव्हापासून मुले दत्तक दिली जात होती. त्यावेळी ‘कारा’ म्हणजेच ‘सेंट्रल ऍडॉप्शन रिसोर्स ऍथॉरिटी’ अस्तित्वात नव्हती. परंतु 2008 मध्ये कायद्याने प्रति÷ानला दत्तक केंद्र म्हणून मान्यता मिळाली व काराही अस्तित्वात आली. तेव्हापासून कायद्याचे पालन करत आजपर्यंत 106 मुले दत्तक देण्यात आली आहेत.
दत्तक म्हणजे नेमके काय?
दत्तक म्हणजे जैविकदृष्टय़ा जन्म दिलेल्या पालकांपासून अर्भकाची कायमस्वरुपी मुक्तता करून कायद्याने संमत असणाऱया पालकांकडे अर्भकाला सोपविणे व त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेणे होय. या पालकांनीच बाळाच्या हक्कांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्युवेनाईल जस्टीस कायदा 2015 कलम 2 (2) अंतर्गत ‘दत्तक’ या शब्दाची ही व्याख्या करण्यात आली आहे.
हिंदू दत्तक व संगोपन कायदा म्हणजेच हिंदू ऍडॉप्शन ऍण्ड मेंटेनन्स ऍक्ट (हामा) 1956 हा काय आहे?
हा कायदा हिंदू, जैन, शीख, बौद्ध या सर्वांना लागू आहे. या अंतर्गत 15 वर्षांपर्यंतच मूल दत्तक घेता येऊ शकते. जोडप्याला जर मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेता येऊ शकतो व मुलगा असेल तर मुलगी दत्तक घेता येऊ शकते. जन्म दिलेले पालक किंवा कायद्याने असणारे पालक दत्तक देऊ शकतात. मात्र, यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. तथापि, अशा प्रक्रियेमध्ये मूल दत्तक दिल्या जाणाऱया कुटुंबाचे योग्य मूल्यमापन होत नाही. कदाचित मुलाची तस्करी किंवा विक्री होऊ शकते.
दत्तक देण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे?
बऱयाचदा बेवारस किंवा अनाथ नवजात बाळ पोलीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. आमच्या संस्थेच्या आवारात जर नवजात बाळ आढळले तर संस्था सिव्हिलमध्ये बाळाला दाखल करून पोलिसांना त्याची माहिती देते. बाल कल्याण समितीला माहिती द्यावी लागते. बाळाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. पोलिसांना या बाळाच्या पालकाचा शोध घेण्यासाठी 3 ते 4 महिने अवधी दिला जातो. त्यानंतर बाळ दत्तक देण्याच्या प्रक्रियेसाठी अंतर्भूत केले जाते.
दत्तक कोणाला घेता येते?
ज्यांना मूल होऊ शकले नाही असे जोडपे, कायदेशीर पालक मुलाचा सांभाळ करण्यास राजी नसतील तर, जन्मदात्या पालकांनीच मूल नाकारले तर, एकल पालक बाळाचा सांभाळ करण्यास असमर्थ असतील तर अशा मुलांना दत्तक घेता येऊ शकते. मूल न झाल्याने दत्तक घेण्यासाठी अर्ज करता येतो. दोन वर्षाच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बाळाला दत्तक देता येते.
दत्तक कोण घेऊ शकते?
ज्या जोडप्याचे लग्न होऊन दोन वर्षे झाली आहेत व त्यांचे लग्न यशस्वी ठरले आहे, असे जोडपे मूल दत्तक घेऊ शकते. मूल दत्तक घेण्यासाठी दोघांचीही संमती आवश्यक आहे. एकल महिला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते. परंतु एकल पुरुष मुलगी दत्तक घेऊ शकत नाही. कुटुंबामध्ये 3 मुलांपेक्षा अधिक मुले असू नयेत. पालक आणि बाळामध्ये 25 वर्षापेक्षा अधिक अंतर असू नये.
दत्तक देण्यापूर्वीची प्रक्रिया काय आहे?
पालकांनी मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर पालकांचे प्रथम समुपदेशन केले जाते. त्यांची मानसिक तयारी झाल्यानंतर ‘कारा’वरती त्याची नोंदणी केली जाते. पालकांना किंवा पालकांतर्फे संस्था सर्व कागदपत्रे कारावर अपलोड करते. प्रतीक्षा यादीनुसार प्राधान्यक्रम ठरवला जातो. म्हणजेच ती ‘कारा’च्या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. त्याचबरोबर जिल्हा बाल संरक्षण समितीकडे माहिती पाठवावी लागते. पुढे त्या पालकांच्या कुटुंबाची पाहणी करण्यासाठी संस्थेच्या समाज सेवक मेघा कानट्टी व दीपा मुतवाड या घरी जाऊन सर्व माहिती संकलित करतात. त्या आपला अहवाल तयार करतात व तो ‘कारा’वर अपलोड केला जातो. त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार प्राधान्यक्रम ठरविला जातो. न्यायालयात याचिका दाखल केली जाते. ‘कारा’ने हिरवा कंदील दिल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन मूल दत्तक दिले जाते. ‘कारा’वर असलेली माहिती पाहून इच्छुक पालक त्या बाळाला आरक्षित करू शकतात. संस्थेच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष येऊन पाहणी करून जाऊ शकतात.
दत्तक दिल्यानंतर संस्थेचा त्या बाळाशी संबंध राहतो का?
सलग दोन वर्षे संस्थेचे समाजसेवक त्या घरी जाऊन दर सहा महिन्याला एकदा भेट देतात. या भेटीमध्ये बाळ कसे रमले आहे, त्याची काळजी घेतली जात आहे का? हे सर्व पाहिले जाते. चुकून एखाद्या बाळाने किंवा मुलाने तक्रार केल्यास संस्था विचारविनिमय करते. बाहेरच्या जिल्हय़ातील किंवा राज्यातील बाळ स्थानिक पातळीवर दत्तक दिले गेले असेल तर तेथे जावून संस्थेला फॉलोअप घेण्याचा अधिकार आहे.
दत्तक घेतल्यानंतर जोडप्याला स्वत:चे मूल झाले तर दत्तक बाळ परत करू शकतात का?
अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये दत्तक बाळाच्या मानसिक आणि भावनिकतेचा विचार महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे असे बाळ पुन्हा संस्था आपल्या ताब्यात घेऊ शकते. त्यामुळेच बाळ दत्तक देण्यापूर्वी पालकांची सर्व माहिती संकलित केली जाते.
दत्तक विधीबद्दल समाजाला काय सांगू इच्छिता?
अलीकडे हॉस्पिटलमधून बाळ परस्पर दत्तक देण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु कायद्याने तो गुन्हा आहे. शिवाय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पुढे अडचणी येऊ शकतात. प्रत्येक बाळाला 18 वर्षांनंतर आपली मुळे शोधण्याचा अधिकार आहे. अशावेळी परस्पर दत्तक घेतल्या गेलेल्या बाळाच्या पालकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहतात.
महत्त्वाचे म्हणजे मूल होत नाही म्हणताच विविध बाहय़ वैद्यकीय उपचार करून मूल जन्माला घालण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. या दरम्यान अनेक भावनिक, मानसिक व आर्थिक समस्या उद्भवत आहेत. हे सर्व टाळून मूल दत्तक घेणे हा उत्तम पर्याय आहे. एक बाळ दत्तक घेऊन त्याला घडविणे हे जितके आव्हानात्मक तितकेच आनंददायी आहे.
संस्थेतून आजपर्यंत 106 मुलांना दत्तक दिले आहे. त्यातील 6 मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर दत्तक देण्यात आली आहेत. भारतामध्ये विशेष म्हणजेच दिव्यांग मूल घेण्याची मानसिकता परदेशाच्या तुलनेत कमी आहे. मात्र, परदेशात आपली मुले असूनही विशेष मुलांना दत्तक घेतले जाते, हे विशेष होय.