जिल्हय़ात 70 टक्के भातलावणी पूर्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
sजिल्हय़ात पावसाने गेल्या आठवडाभर सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या भातलावणीच्या कामांनी जोर धरला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून 70 टक्के लावण्या पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र सध्या पडणाऱया तुफान पावसामुळे खाजण, सखल भागातील, नद्यांच्या किनारी असलेल्या पाण्याचा निचरा न होणाऱया शेतलावण्यांची कामे काहीशी रखडली असून नागली पिक लावणीची कामेही वेगाने सुरू आहेत.
जिल्हय़ात पारंपरिक बियाणे व सुधारित बियाण्यांची शेतकऱयांकडून लागवड करण्यात आली आहे. खरीपात प्रामुख्याने भातशेती हे मुख्य पीक व इतर पिकांमध्ये नागली, वरई, भुईमुगासह भाजीपाला पिकेही घेतली जातात. यावर्षी पूर्वमोसमी पावसाला 1 जूनपासून सुरूवात झाल्यानंतर लगेचच 4 दिवसांनी मान्सूनचे आगमन कोकणात झाले. त्यामुळे खरीपाच्या कामांनाही वेळेत प्रारंभ झाला. जिह्यात 67 हजार हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भात रोपांसाठी साडेसहा हजार हेक्टरवर रोपवाटीका तयार करण्याचे नियोजन होते.
गेल्या 15 जूनपर्यंत 100 टक्के पेरण्या पूर्णत्वास गेल्या होत्या. रोपेही जोमदार तयार झाली. मात्र ऐन लावणीच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात पावसाचे दणक्यात पुनरागमन झाले. गेल्या 8 दिवसांपासून संततधार पाऊस जिल्ह्य़ात सुरू असल्याने पावसामुळे रखडलेली भातलावणीची कामे अंतिम टप्प्याकडे पोहोचली आहेत.
9 हजार हेक्टरवर नाचणी लागवडीचे क्षेत्र
जिह्यात 9 हजार हेक्टरवर नाचणी लागवडीचे क्षेत्र आहे. नागली पिकांच्या लावणीला सततच्या मुसळधार पावसाचा खो बसत आहे. खाजण व सखल भागातील, नद्यांच्या किनारी असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱया भागातील शेत लावण्यांची कामे रखडली आहेत. मात्र नागली पिकांच्या कामांनी गती घेतली आहे.