मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश ः मिरगाव, हुंबराळे, आंबेघर गावांचा समावेश
प्रतिनिधी/ सातारा
कोयना धरणाच्या पट्टय़ातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या क्वार्टर्समध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. मंगळवारी त्यांनी त्यानी स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यानी या वसाहतींची डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या 150 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.
गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसलेला होता. यात या परिसरातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावात देखील दरड कोसळून त्यात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मिरगाव आणि हुंबराळी या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱयांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिह्यापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे.
यानंतर या ग्रामस्थांशी चर्चेत कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. आज त्यांची अवस्था दयनीय आहे. मात्र या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने त्यानी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना दिले. तसेच या दरदग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू, असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ठाण्याहून पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
धीर दिला अन मदतही केली
मंत्री शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही त्यानी यावेळी बोलताना दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत दिली. यासोबतच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असेही त्याना सांगितले.